Join us  

"मिमिक्री करणाऱ्याला, हुबेहुब दिसणाऱ्याला" म्हणत किरण मानेंचा 'राज'कीय संताप; पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:45 PM

राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज यांच्यावर टीका करण्यात आली.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत जाऊन भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच भेट घेतली. त्यानंतर, मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, अद्यापही मनसेच्या महायुतीतील प्रवेशाबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यातच, मनसे महायुतीत येण्यापूर्वीच महायुतीतून बाहेर पडलेल्या रासपने पुन्हा घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे महादेव जानकर यांना महायुतीकडून एक जागाही देण्यात आली. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला काय मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, मनसेचा महायुतीतील प्रवेश अनेकांच्या पचनी पडत नसल्याचे दिसून येते. 

राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून राज यांच्यावर टीका करण्यात आली. तर, उद्धव ठाकरेंनीही भाजपाला ठाकरे हवेत आहेत, महाराष्ट्रात मत मागण्यासाठी ठाकरे पाहिजे, म्हणून ठाकरेला सोबत घेत असल्याची टीका केली होती. तर, संजय राऊत यांनीही टीका करताना, मनसेच्या महायुतीमधील सहभागाने काहीही फरक पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता, शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि अभिनेते किरण माने यांनी ट्विटरवरुन पोस्ट करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावल्याचे दिसून येते. 

''समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्‍या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.'', असे म्हणत किरण मानेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसून येते. तसेच, उद्धव ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार असून शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल केला. कुणी कितीही आपटा... तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है ! ईषय कट.. असे म्हणत माने यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

किरण मानेंची पोस्ट

उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं 'काॅपी पेस्ट' नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला. 

समजा एखादा अभिनेता महान आहे... जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्‍या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते.

उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव 'कॅश' करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. "माझ्या उद्धवला सांभाळा" ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं.

आपण नेहमी म्हणतो बघा. 'आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.'....तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव 'वापरून' त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते.

बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत.

आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काॅंग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काॅंग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडीया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते.

आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. 'जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची', हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय.

कुणी कितीही आपटा... तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' नाम ही काफी है ! ईषय कट.

- किरण माने.

टॅग्स :राज ठाकरेमनसेकिरण मानेउद्धव ठाकरे