Maharashtra Politics ( Marathi News ) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक काही दिवसातच होणार आहेत. राजकीय पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पक्षांमध्येही हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. "आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं," असे त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतून मंत्रिपदाची संधी न मिळाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याबाबतही विधान केले. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
"भास्कर जाधव हे आमचे सहकारी आहेत, शिवसेनेचे ते प्रमुख नेते आहेत. राजकारणातला त्यांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. शिवसेनेच्या वाढीत त्यांचे नक्कीच योगदान आहे. आम्हाला सगळ्यांना ते प्रिय आहेत. ते बराच काळ त्यांच्या मतदारसंघात किंवा कोकणात असतात. त्यांच्याकडे पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.
भास्कर जाधव यांच्या नाराजीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हाडाचे शिवसैनिक आहेत. कडवट शिवसैनिक आहेत. आक्रमक आणि छान बोलतात, छान लढतात, आमच्या भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे? त्यांच्या मनात काय वेदना आहेत? ते आम्ही नक्की समजून घेऊ. ते आमचेच आहेत.
उद्धव ठाकरेंनी त्यावेळी सगळ्यांसोबत चर्चा केली होती
"कोणाला वाटेल की आमदार फुटून जावेत? खासदार फुटून जावेत? कोणालाही वाटणार नाही. शरद पवार साहेबांचं ते उदाहरण देत आहे. ते बरोबर आहे. पण, तरी तरीही अडीच वर्षांनी अजित पवार ४०-४२ आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना स्वतःच्या तोंडात गद्दारीचं शेण भरायचं आहे ते थांबणार नाहीत. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर ईडी, सीबीआय, पोलीस यांचा दबाव आहे. त्यांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी सगळ्यांसोबत चर्चा केली होती. थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येकाची दुखणे वेगळी होती, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.