Maharashtra Election 2019: आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 17:31 IST2019-10-11T17:30:38+5:302019-10-11T17:31:39+5:30

अनेक नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी भाजपाने प्रलोभनं दिली, सर्वात जास्त त्रास पद्मसिंह पाटील कुटुंब सोडून गेल्याचा झाला.

Maharashtra Election 2019: We played on different mother's lap - Ajit Pawar Reaction on Sushilkumar Shinde | Maharashtra Election 2019: आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय - अजित पवार 

Maharashtra Election 2019: आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय - अजित पवार 

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात गदारोळ माजला आहे. भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलीनीकरण होऊ शकतं असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. 

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये होणार नाही. आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय, काँग्रेस-राष्ट्रवादी थकलेत हे विधान कदाचित सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत:च्या वयावरुन केलं असावं असं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विलीनीकरण हा मुद्दा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 

तसेच चंद्रकांत पाटील यांनी पवार घराण्यातील तरुण पिढी भाजपाच्या वाटेवर आहे असं सांगतात. माझ्याबद्दल तर ते बोलणार नाही, सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही बोलण्याची शक्यता नाही कारण ती तरुणी आहे. मग पुढची पिढी कोण हे घरी जाऊन विचारतो असं सांगत अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. तसेच यावेळी चंद्रकांत पाटील यांना चंपा का बोलता असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला त्यावेळी सध्या सगळीकडे शॉर्ट शब्द वापरतात म्हणून चंद्रकांत पाटील यांचे नावं चंपा असं बोलतो. 

दरम्यान, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, अनेक नेत्यांना पक्ष सोडण्यासाठी भाजपाने प्रलोभनं दिली, सर्वात जास्त त्रास पद्मसिंह पाटील कुटुंब सोडून गेल्याचा झाला. शरद पवारांच्या सुरुवातीपासून ते त्यांच्यासोबत होते. शेवटी राजकारण असतं पण तुमच्या गरजेला कुटुंब धावून येतं. त्यामुळे तो त्रास झाला असं त्यांनी सांगितले. 

विनोद तावडेंना तिकीट दिलं नाही त्याचं वाईट वाटलं. विरोधी पक्षनेते असताना ज्या आक्रमक पद्धतीने ते बोलायचे, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन असताना जे सोशल इंजिनिअरींग करण्यासाठी वेगवेगळे चेहरे आणले त्यात मराठा चेहरा म्हणून विनोद तावडेंना पुढे आणलं. लेवा पाटील म्हणून एकनाथ खडसेंना पुढे आणलं, धनगर म्हणून अण्णासाहेब डांगे यांना पुढे आणलं. त्यावेळी चंद्रकात पाटील हेदेखील नव्हते. त्यांचा पत्ता कट करण्यात आला ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे असं अजित पवारांनी सांगितले.  
 

Web Title: Maharashtra Election 2019: We played on different mother's lap - Ajit Pawar Reaction on Sushilkumar Shinde