Join us  

Maharashtra Corona Updates: राज्यात पुन्हा विक्रमी वाढ; आज जवळपास ५० हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद, २७७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 8:32 PM

Maharashtra Corona Updates: ३७ हजार ८२१ जण आज कोरोनामुक्त झाले आहेत. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours)

मुंबई: राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात तब्बल ४९ हजार ४४७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३७ हजार ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. (Maharashtra reports 49,447 new coronavirus case and 277 deaths in the last 24 hours)

राज्यात आज ४९,४४७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ३७८२१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत .एकूण २४९५३१५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण ४०११७२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८४.४९% झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबई आणि पुणे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचं केंद्र ठरत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईची दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत असून आज शहरात तब्बल ९ हजार ९० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एकूण २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांची आकडेवारीसोबतच मृत्यूंचा आकडाही मुंबईत वाढताना दिसतोय. काल मुंबईत २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर गुरुवारी १८ जणांचा मृत्यू झाला होता. 

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

मुंबईत सध्या ६२ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ५ हजार ३२२ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८३ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख ६६ हजार ३६५ इतकी झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कडक लॉकडाऊनचेच संकेत-

कोरोनाच्या दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goverment) काय पावलं उचलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत. ''हळूहळू गोष्टी बंद करून आपण प्रयत्न करून पाहिले. पण लोक ऐकत नाहीत. त्याऐवजी एकदम बंद करून हळूहळू गोष्टी सुरू केल्यास फायदा होतो'', हा आपला अनुभव असल्याचं सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी संपादकांसोबतच्या बैठकीत केलं. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याआधीच कडक निर्बंध

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये याआधीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून आल्यानं आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचं सांगितलं जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र सरकार