Join us  

Maharashtra Bandh: आम्ही हफ्ते देतो मग बंद का पाळायचा? दादरमध्ये भाजीवाल्यांचं शिवसेनेला चोख उत्तर, भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 9:29 AM

Mahavikas Aghadi Called Maharashtra Bandh: अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे अशी टीकाही भाजपाने केली आहे.

मुंबई – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) इथं झालेल्या घटनेवरुन महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल केंद्र सरकारचा निषेध करावा यासाठी राज्यात बंद केला आहे. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी उत्स्फुर्तपणे व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. तर काही ठिकाणी सर्व व्यवहार सुरळीत असल्याचं दिसून येत आहे.

महाराष्ट्र बंदच्या(Maharashtra Bandh) पार्श्वभूमीवर भाजपानेही सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका सुरु केली आहे. दादरमध्ये भाजी मार्केट सुरूच असल्याचं माध्यमांमध्ये दाखवण्यात आलं होतं. आता हाच धागा पकडत भाजपाने(BJP) शिवसेनेला(Shivsena) खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते डॉ. संजय कुंटे म्हणाले की, "महावसुली" आघाडीने पुकारलेल्या बंदला शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या "दादर" मध्येच प्रतिसाद नाही, आम्ही हप्ते देतो तर बंद का पाळायचा भाजी वाल्यांचे चोख प्रत्युत्तर आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

१०५० कोटींच्या दलालीचे पुरावे मिळाल्यानं राजकारण

अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. १०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे. लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(Keshav Upadhye) यांनी सरकारला विचारला आहे.

बंदसम्राटांचा इतिहास आठवा

बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित"बंदसम्राटांचा" पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले. एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच. हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा "धंदा" गोळा होतो त्यावरच "चंदा अशा शब्दात भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

महाराष्ट्र बंदमध्ये काय सुरू अन् काय बंद?

महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे. उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हॉटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील असणार नाही.

महाराष्ट्र बंदचे लाईव्ह अपडेट वाचण्यासाठी यावर क्लिक करा 

टॅग्स :Maharashtra Bandhशिवसेनाभाजपालखीमपूर खीरी हिंसाचार