12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 10:18 IST2020-01-02T10:16:44+5:302020-01-02T10:18:26+5:30
राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून राज्यातील 10 रुपयांच्या थाळींची वर्गवारीही जाहीर केली आहे

12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त 18 हजार नागरिकांनाच 10 रुपयांत थाळी
मुंबई - ठाकरे सरकारची 10 रुपयातील थाळी योजना हसू ठरते की काय असंच दिसून येत आहे. कारण, राज्य सरकारने राज्यभरात 10 रुपयांत सात्विक जेवण देण्याचा शासन निर्णय जारी केला असून 10 रुपयात ही थाळी नागरिकांना मिळणार आहे. मात्र, या थाळींची संख्या मर्यादीत असल्याने या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण, साधारण 2 कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मुंबईला फक्त 450 थाळ्या देण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून राज्यातील 10 रुपयांच्या थाळींची वर्गवारीही जाहीर केली आहे. त्यानुसार, राज्यात केवळ 18000 थाळ्या दरदिवसाला वाटप करण्यात येणार आहेत. त्यामुळे, 12 कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राला 18,000 थाळ्या कशा पुरतील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेत मुंबई शहर आणि उपनगरसाठी सर्वात जास्त 1950 थाळ्या देण्यात आल्या आहेत. तर सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीला सर्वात कमी 150 थाळ्या देण्यात आल्या आहेत.