Join us  

Raj Thackeray: फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा - राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 7:48 PM

राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीतून येते, राज बारामतीचे पोपट आहेत या मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला

मुंबई -  राज ठाकरे यांची स्क्रिप्ट बारामतीतून येते, राज बारामतीचे पोपट आहेत या मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. फडणवीस म्हणजे हवा गेलेला फुगा आहेत, ज्यांची कपडे आम्ही उतरवले ते आमच्यावर बोलतात अशी टीका राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. 

राज ठाकरेंनी यावेळी बोलताना नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. मी ९ मार्चच्या भाषणात पुलवामाबद्दल, एअर स्ट्राइकबद्दल प्रश्न विचारले त्यावर फडणवीस आणि भाजप नेते उत्तर देण्याऐवजी भलतंच बोलत बसलेत. भाजपवाल्यांकडे या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कारणे नाहीच. ज्या शरद पवारांविषयी मोदी यांनी बारामतीत येऊन टीका केली होती तेच मोदी निवडणुकीनंतर शरद पवारांबरोबर एकाच व्यासपीठावर पवारांवर स्तुतीसुमने उधळतात याची चित्रफित दाखवत राज यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. 

दरम्यान माझ्यासाठी विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे आधीच मी सांगितले होते. मागील काही दिवसांपासून मनसेला आघाडी घेणार की नाही, किती जागा लढवणार या सर्व चर्चांना राज यांनी आज उत्तर दिलं. गेले कित्येक दिवसांत मी पत्रकारांना भेटलोच नाही पण तरीही मनसे एक सीट दोन सीट लढवणार असे तर्क लढवायला माध्यमांनीच सुरुवात केली. पण माझा पाडवा मेळावा आठवा, मी म्हणालो होतो देशातील सर्व पक्षांनी मोदी आणि शाह ह्यांच्या विरोधात एकत्र यायला हवं. मी अजित पवारांना आणि अशोक चव्हाणांना फोनवर बोललो की मी तुम्हाला कधी सीट्स मागितल्या, कधी युतीची चर्चा केली? ह्यावर ते म्हणाले नाही, मग तुम्ही माध्यमांसमोर का बोलत सुटलात? असा प्रश्न अशोक चव्हाण आणि अजित पवारांना विचारल्याचं राज यांनी सांगितले.

तसेच राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदी-शाह ह्यांच्या विरोधात प्रचार करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला.अमित शाह आणि नरेंद्र मोदी ही जोडी सत्तेच्या बाहेर काढा. आत्ताची लढाई ही पक्षाशी नाही तर मोदी आणि अमित शाह ह्यांच्या विरोधात आहे आणि म्हणूनच त्यांच्या उमेदवारांना मतदान न करणं आणि त्यांना मदत न करणं हाच उद्देश असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. 

नरेंद्र मोदी हे चौकीदार कॅम्पेन करत बसलेत, जरा मोठा विचार करा, ह्यांच्याकडे काही दाखवण्यासारखं नाही म्हणून हे चौकीदार कॅम्पेन करत बसलेत माझ्यासाठी  आत्ता पक्ष महत्वाचा नाही तर देश संकटात आहे. मी ह्या पुढे ज्या सभा घेणार आहे तिकडे मी मोदी-शाहच्या विरोधात बोलत राहणार असल्याचं राज यांनी सांगितले.  

टॅग्स :लोकसभा निवडणूकअमित शहानरेंद्र मोदीराज ठाकरेदेवेंद्र फडणवीस