Join us  

मुलांच्या पळवा-पळवीवरुन महाजन-आव्हाडांमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 3:03 PM

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मुले पळवणारी टोळी सक्रीय झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध राहवं असं ट्विट करत भाजपवर निशाना साधला. जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला.

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षात आयाराम-गयाराम यांची मालिका सुरु झाली आहे. शिवसेनेचे अमोल कोल्हे यांनी शिवबंधन तोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधले तर मनसेच्या एकमेव आमदाराने शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वात महत्त्वाची घडामोड घडली ती म्हणजे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

अहमदनगरच्या जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष अखेर भाजपच्या फळाला आला. सुजय विखे पाटील यांचा पक्ष प्रवेश करुन भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कुरघोडी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मुले पळवणारी टोळी सक्रीय झाली असून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावध राहवं असं ट्विट करत भाजपवर निशाना साधला 

जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. आता विरोधकांची मुलेच नव्हे तर नातवंडेही पळवणार आहोत असं म्हणत गिरीश महाजनांनी आव्हाडांना टोला लगावला. एका वाहिनीवर मुलाखती दरम्यान महाजन बोलत होते. 

यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, तुम्ही मुले नातवंड सांभाळू शकत नाहीत का? विरोधकांनी आत्मपरिक्षण करावे, काही पक्षात आमचे घर म्हणजे आमचा पक्ष असे समीकरण आहे, मग कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का ? सुजय विखे-पाटील यांच्यामागे विखे-पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडचं कोणीही आमच्याकडे येत असतील,तर त्यांचे स्वागत आहे. मात्र केवळ आमच्याकडेच असे इनकमिंग नाही. त्यांनीही धनंजय मुंडे,भास्कर जाधव, नाना पटोले यांना पळवले नाही का? असेही महाजन यांनी विचारले.

महाजनांच्या टोल्यानंतर पुन्हा जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत शाहू,फुले,आंबेडकरांच्या विचारांचा वारसा चालवणार्‍यांचे अनेक नातू-पणतू वैचारीक आग ओकताहेत. मुलचं नव्हे तर नातू-पणतू सगळे पळवा, तुमची पळवा-पळवी तुम्हाला लखलाभ असं म्हणत महाजन यांना टोला लगावला. तसेच तुमच्या पळवा पळवीने आमच्या इथं कष्टकरी, निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल असंही सांगितले. 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूकजितेंद्र आव्हाडगिरीश महाजनभाजपा