Join us  

Lockdown in Maharashtra: राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 7:41 PM

Lockdown in Maharashtra: राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. 

मुंबई: राज्यात उद्यापासून कडक निर्बंधलावण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी केली आहे. (weekend lockdown In Maharashtra; Nawab Malik Told)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत.  कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे. 

Lockdown in Maharashtra: शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन; नवाब मलिकांची घोषणा

राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन दिवसांचं विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी अंशतः लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

राज्यात सध्या रुग्णालयात खाटांची कमतरता भासत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावरही सरकारने लक्ष द्यावे. लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांचे खूप हाल होणार आहे. त्यामुळे या सर्व घटकांसाठी सरकारने काहीतरी तरतूद करावी, सोबतच यासाठी बैठक घ्यावी असे आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठीही सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मदत करण्याचेही त्यांनी आवाहन केलं. मधल्या काळात राज्य सरकार गाफिल राहिल्याने ही वेळ आली असल्याची टीकाही देवेंद्र फडवणीस यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रोज ४० हजारांच्या वर रुग्ण समोर येत आहेत. आधीपासूनच राज्यातील पुण्यासह अनेक शहरांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं. 

मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची  रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन  केले. 

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारभाजपामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस