Nawab Malik: दाऊदसोबत कनेक्शन असलेला 'तो' मंत्री १० वर्ष नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात होता; नवाब मलिकांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 10:07 IST2021-11-01T10:05:29+5:302021-11-01T10:07:40+5:30
बनारसमधून दोन लोकं तत्कालीन मंत्री रमेश दुबे यांच्यासोबत मुंबईत आले. तेव्हा पवारांच्या नावानं अफवा पसरवण्यात आली असं स्पष्टीकरण मलिकांनी दिलं आहे.

Nawab Malik: दाऊदसोबत कनेक्शन असलेला 'तो' मंत्री १० वर्ष नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात होता; नवाब मलिकांचा खुलासा
मुंबई – ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी थेट भाजपाचे देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली ड्रग्जचा व्यवसाय सुरू आहे असा आरोप मलिकांनी लावलेला आहे. या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी मलिकांनी केला. ड्रग्जचा मास्टर माईंड महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का? असा प्रश्न मनात निर्माण होत असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
त्याचसोबत नवाब मलिकांनीभाजपा नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपावर प्रतिटोला लगावला आहे. नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्रात ५ वर्ष सरकार होतं, अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार आलं. त्या काळात जे आरोप करण्यात आले त्यात काही तथ्य नव्हतं. अंधेरीचे काँग्रेस नगरसेवक पुरुषोत्तम सोलंकी हे नगरसेवक होते. त्यांच्यावरही १९९३ बॉम्बस्फोटानंतर गुन्हा दाखल करत टाडा लावण्यात आला. त्यानंतर ते गुजरातच्या भावनगरला स्थलांतरित झाले. अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. सोलंकी यांचे छोटा शकील, दाऊद यांच्यासोबत संबंध होते. किरीट सोमय्या यांनी माहिती घ्यावी. आमचं सरकार असताना सोलंकी यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नंतर मुंबई सोडून ते गुजरातला शिफ्ट झाले होते. भावनगरमधून निवडून आले. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या कॅबिनेटमध्ये ते १० वर्ष मंत्री होते असा आरोप मलिकांनी केला आहे.
त्यामुळे बनारसमधून दोन लोकं तत्कालीन मंत्री रमेश दुबे यांच्यासोबत मुंबईत आले. तेव्हा पवारांच्या नावानं अफवा पसरवण्यात आली. आरोपात तथ्य नव्हतं. कुणीही समोर आलं नाही. दाऊदसोबत कनेक्शन असलेला माणूस मोदींच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात कसा होता? याची विचारणा किरीट सोमय्या यांनी नरेंद्र मोदींना विचारावा. त्यानंतर त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील अशा शब्दात नवाब मलिकांनी सोमय्यांना टोला लगावला.
काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
१३ दिवस चाललंय काय, समीर वानखेडे हिंदू नाही मुस्लिम, क्रांती रेडकर तुझं लग्न हिंदू पद्धतीनं झालं पण तुझा पती मुस्लिम आहे. त्याचा पहिला निकाह मुस्लिम पद्धतीने झालं होतं. त्याच समीरचे वडील ज्ञानदेव नाही तर दाऊद आहे. त्याचा बाप दाऊद नाही तर तुमच्या सरकारचे पालक असलेल्या शरद पवार यांना जाऊन विचारा की १९९३-१९९४ मध्ये दाऊदसोबत विमानाने कोण बसलं होतं ते?, अशी बोचरी टीका किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यावरुन मलिकांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.