गणेशोत्सवात लोकल, मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा, मंगलप्रभात लोढा यांच्या प्रशासनाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:09 IST2025-08-05T13:09:17+5:302025-08-05T13:09:39+5:30
गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. यावेळी भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू

गणेशोत्सवात लोकल, मेट्रो रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा, मंगलप्रभात लोढा यांच्या प्रशासनाला सूचना
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून, रात्री उशिरापर्यंत गणेशभक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे गणेशभक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरू ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सह-पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. महापालिकेच्या ग्रँट रोड येथील ‘डी’ विभाग कार्यालयात आयोजित जनता दरबारात ते बोलत होते.
गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणेशभक्त मुंबई परिसरात दाखल होतात. यावेळी भक्तांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक सुरू असणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहितीही लोढा यांनी जनता दरबारात दिली. प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.
संक्रमण शिबिरासंदर्भात रहिवाशांनी मांडल्या तक्रारी
जनता दरबारात अनेक नागरिकांनी म्हाडा संबंधित पुनर्विकास, दुरुस्ती आणि संक्रमण शिबिरासंदर्भात तक्रारी मांडल्या होत्या. नागरिकांना संक्रमण शिबिराची सोय न करता इमारती रिकाम्या करण्यासाठी नोटीस दिल्या होत्या.
या संबंधित रहिवाशांची बाजू लोढा यांनी ऐकून घेतली. यासंदर्भात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असून, संक्रमण शिबिर झाल्याशिवाय रहिवाशांना घर रिकामे करण्याची नोटीस देऊ नये, अशी सूचना करणार असल्याची माहिती लोढा यांनी यावेळी दिली.
तसेच संक्रमण शिबिर तयार नसल्यास त्वरित इमारतीची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.