कांदिवली, बोरीवली सर्वाधिक थंड; मराठवाड्यासह विदर्भ गारठला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 16:04 IST2020-11-10T16:03:36+5:302020-11-10T16:04:01+5:30
Coldest Mumbai : थंडीचा प्रभाव सर्वाधिक आहे.

कांदिवली, बोरीवली सर्वाधिक थंड; मराठवाड्यासह विदर्भ गारठला
मुंबई : सांताक्रूझ, बोरीवली, कांदिवली, मुलुंड, नेरुळ आणि पनवेल येथील किमान तापमान २० अंशाखाली घरसले असून, मुंबई सर्वाधिक कमी किमान तापमान चंद्रपूर येथे ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे किमान तापमानाचा पारा अधिकाधिक घसरत असून, मराठवाडा आणि विदर्भात काही भागात थंडीचा प्रभाव सर्वाधिक आहे. येथील किमान तापमान सरासरीपेक्षा ५ ते ६ अंशाखाली नोंदविण्यात येत असून, बुधवारसह गुरुवारी हवामानाची ही स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातदेखील आता ब-यापैकी थंडीचा प्रभाव जाणवत असला तरी दिवसाच्या तापमानात घसरण झालेली नाही. कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास नोंदविण्यात येत असून, रात्रीचे किमान तापमान मात्र २० अंशाखाली नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, उत्तरोत्तर यात आणखी घसरण होईल आणि थंडीचा प्रभाव आणखी जाणवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्याचा विचार करता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक थंडी जाणवत असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे शीत वारे वाहू लागल्यानंतर यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, उत्तर भारतात देखील थंडीचा प्रभाव अधिक असून, दिल्लीचे किमान तापमान १० अंशाखाली घसरले आहे.
--------------
राज्यातील शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिसमध्ये
सांताक्रूझ १९.२
कुलाबा २२.५
पुणे ११.३
बारामती ११.९
औरंगाबाद १२.५
महाबळेश्वर १३.६
नाशिक ११.८
डहाणू १९.८
जळगाव १२
कोल्हापूर १६
सातारा १२.८
सोलापूर १३
चंद्रपूर ८.६
परभणी १०.१
यवतमाळ ९.५
गोंदिया १०.५
नागपूर ११.५