15 डिसेंबरपासून मुंबईतील सामान्यांसाठी लोकल, शाळा सुरु करण्याचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 08:16 IST2020-11-26T08:16:20+5:302020-11-26T08:16:59+5:30
CoronaVirus Mumbai Local: दिवाळीला नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच एकमेकांच्या घरी, एकत्रितपणे दिवाळी साजरी केली होती. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्य़क्त होत आहे.

15 डिसेंबरपासून मुंबईतील सामान्यांसाठी लोकल, शाळा सुरु करण्याचे संकेत
मुंबई : थंडी आणि दिवाळीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हे रुग्ण न वाढल्यास मुंबईत सामान्यांसाठी लोकल आणि शाळा सुरु करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले की, सध्या दररोजची रुग्णसंख्या ९०० ते १०००पर्यंत असून, विविध रुग्णालयांत सुमारे ९६०० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना वाढवल्या. त्यामुळे संसर्गाचा वेग रोखता आला आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित अंतर, मास्क लावावा. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. ही काळजी घेतली नाही, तर संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन टाळणे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे, असे ते म्हणाले.
पुन्हा रुग्णवाढ झाली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा तोंड देण्यास सज्ज आहे. साडेबारा हजार खाटा सध्या रिक्त आहेत. त्यात आयसीयूच्या एक हजार खाटा उपलब्ध आहेत. जम्बो सुविधा असलेली नऊ करोना केंद्रे व रुग्णालये अद्याप बंद केलेली नाहीत. आवश्यकता वाटेल तेव्हा ही केंद्रे पुन्हा सुरू करता येतील. खबरदारी म्हणून बुधवारपासून विमानतळ, रेल्वे स्थानके यासह जिथून बाहेरगावावरून येणारे प्रवासी यांची करोना चाचणी अहवाल किंवा नवीन चाचणी सक्तीची केली आहे. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागेल. बुधवारी सर्व ठिकाणी सुरू केलेल्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दिवाळीला नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली होती. तसेच एकमेकांच्या घरी, एकत्रितपणे दिवाळी साजरी केली होती. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्य़क्त होत आहे. गणपतीमध्ये दिवसाला 2500 च्या आसपास रुग्ण वाढू लागले होते. मात्र, अद्यापतरी दिवाळीकाळात ही रुग्णसंख्या 900 च्या आसपास असल्याने दिलासा मिळाला आहे. हे चित्र असेच राहिल्यास सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. रेल्वेने राज्य सरकारच्या कोर्टात लोकल सेवा सुरु करण्याचा चेंडू टोलविला आहे. गर्दीचे नियंत्रण करण्याचे प्लॅनिग करावे, कोरोना रुग्ण वाढल्यास जबाबदारी राज्याचीच असेल असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून राज्य सरकारने रेल्वेच्या मिळालेल्या उत्तरावर काहीच कारवाई केलेली नाही.