श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 18:19 IST2020-07-23T18:19:02+5:302020-07-23T18:19:46+5:30

भारतीय रेल्वेतून ६३ लाख श्रमिकांचा प्रवास 

Indian Railways earns Rs 428 crore from labor special train | श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न

श्रमिक विशेष ट्रेनमधून भारतीय रेल्वेला ४२८ कोटींचे उत्पन्न

मुंबई : लॉकडाऊन काळात देशभरात अडकलेल्या मजूर, श्रमिकांसाठी विशेष ट्रेनचे नियोजन केले होते. या ट्रेनमधून भारतीय रेल्वेला जून अखेरीपर्यंत ४२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यातून सुमारे ६३ लाख श्रमिकांचा प्रवास केला, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून मिळाली आहे. 

रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ यांच्याकडून माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार कामगार दिनी म्हणजे  १ मे रोजीपासून भारतीय रेल्वे श्रमिक विशेष ट्रेन सुरु केली. तेव्हापासून ते २९ जूनपर्यंत या ट्रेनमधून ६२ लाख ९१ हजार १२६ मजूर आपल्या मूळगावी पोहचले आहेत. सर्व मजुरांचे गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनिंग केले जात आहे. प्रवाशांना गाडीत मोफत जेवण आणि पाणी पुरवले जात आहे. या श्रमिक विशेष ट्रेन उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पुदूचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांतून सोडण्यात आल्या. या श्रमिक विशेष ट्रेन आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओरिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलगंणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात परतल्या. यातून भारतीय रेल्वेला एकूण ४२८ कोटी उत्पन्न मिळाले. 

लॉकडाउनमुळे देशभरात अडकलेल्या मजूर, श्रमिकांना आंतरराज्य प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने ‘श्रमिक विशेष’ ट्रेन सेवा सुरु केली. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यावर मजूरांचे काम ठप्प झाले. त्यामुळे मजूर एकाच ठिकाणी अडकून पडले होते. या मजुरांच्या जेवणाची गैरसोय व्हायला लागली. परिणामी, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे श्रमिक विशेष ट्रेन १ मेपासून सुरु केल्या. यातून देशभरातून मजूर आपल्या मूळगावी गेले. यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार येथील सर्वाधिक मजूर आपल्या गावी गेले.

Web Title: Indian Railways earns Rs 428 crore from labor special train