Join us  

'सांगली महापालिकेतील सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 6:07 PM

कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

मुंबई - सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनपा पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले असून राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला असाच धोबीपछाड देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. सांगलीतील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक जयंत पाटलांनी टप्प्यात घेऊन कार्यक्रम केल्याचं म्हणताना दिसत आहे. 

सांगली महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले यांनी हा विजय महाविकास आघाडीच्या एकजुटीचा असल्याचं म्हटलंय. यासंदर्भात पुढे बोलताना पटोले म्हणाले की, सांगली महापालिकेत झालेले सत्तांतर हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. भाजपाच्या एककल्ली कारभाराला जनता कंटळली असून विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी दणदणीत विजयी मिळवला होता. राज्यातील सरकारच्या विकास कामांवर लोकांचा विश्वास वाढला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त करून कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले.

सांगलीतील भाजपाची सत्ता संपुष्टात

महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.

 

टॅग्स :नाना पटोलेसांगलीकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेस