राज्यात दररोज सरासरी तब्बल ९९ अपघात, ४२ जणांचा मृत्यू; वाहनचालकांमध्ये जागरुकतेचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 07:49 IST2026-03-29T07:49:36+5:302026-03-29T07:49:36+5:30
परिवहन विभागाच्या तांत्रिक युनिटला शासनाची मंजुरी

राज्यात दररोज सरासरी तब्बल ९९ अपघात, ४२ जणांचा मृत्यू; वाहनचालकांमध्ये जागरुकतेचा अभाव
मुंबई : राज्यात दररोज सरासरी ९९ अपघात होत असून, यामध्ये सुमारे ४२ जणांचा मृत्यू होतो. ही चिंताजनक बाब अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे शास्त्रीय विश्लेषण (क्रॅश इन्व्हेस्टिगेशन) करण्यासाठी विशेष तांत्रिक यूनिट स्थापन करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने राज्य शासनाकडे सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून यासाठी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे.
कोणत्याही अपघातांनंतर प्राथमिक तपास करण्यात येत असला, तरी अनेक वेळा अपघाताची अचूक कारणे समोर येत नाहीत. वेग, रस्त्यांची स्थिती, वाहनांची तांत्रिक बिघाड, चालकाची चूक, हवामान, सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी अशा विविध घटकांचा एकत्रित परिणाम अपघातांमध्ये दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक अपघाताचा सखोल आणि वैज्ञानिक पद्धतीने तपास होणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले. यासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च शासनाने मंजूर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ई-दार यंत्रणेचा प्रभावी वापर केला जात आहे. या यंत्रणेमुळे अपघातांमध्ये सध्या घट दिसत आहे, अशी माहिती अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी दिली.
विशेष तांत्रिक युनिटचा फायदा काय?
प्रस्तावित विशेष तांत्रिक युनिटमध्ये तांत्रिक ज्ञान असलेले अधिकारी आणि सहायकांचा समावेश असेल. ते प्राणघातक अपघातांची निवड करून त्यांचे 'अपघात विश्लेषण' करेल. या तपासात अपघाताचा घटनाक्रम, वाहनांची स्थिती, ब्रेकिंग पॅटर्न, रस्त्यांची रचना, सिग्नलिंग सिस्टम आणि इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या निष्कर्षाच्या आधारे रस्ता सुरक्षेसाठी ठोस आणि डेटा-आधारित उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. यात ब्लॅक स्पॉट्सची ओळख, रस्त्यांच्या डिझाइनमध्ये बदल, वेगमर्यादा नियंत्रण, सिग्नल व्यवस्थेतील सुधारणा, तसेच चालक जनजागृती मोहिमा यांचा समावेश असू शकतो.
वाहनचालकांमध्ये जागरुकतेचा अभाव
वाहनचालकांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. बेदरकारपणे वाहन चालवणे, नियमांचे पालन न करणे, महामार्गावर लेन सोडणे अशी अनेक कारणे आहेत. त्याचबरोबर रस्त्यांची स्थिती, तांत्रिक बिघाड, हवामान, सिग्नल यंत्रणाही अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहे.
राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी ई-दार यंत्रणेचा प्रभावी वापर सुरू आहे. अपघातांमध्ये सध्या घट दिसत असून पुढे ही प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित संस्थांच्या समन्वयातून अपघातांचे सखोल तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे. भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त, राज्य परिवहन विभाग.