अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा? शिक्षकांना चिंता; शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:14 IST2025-03-22T15:14:18+5:302025-03-22T15:14:35+5:30
पहिली ते आठवीसाठी २० ऑगस्ट २०१०च्या निर्णयानुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती वापरली जाते. त्यानुसार आता द्वितीय सत्रासाठी आकारिक व संकलित मूल्यमापन सुरू आहे. आकारिक मूल्यमापनात प्रकल्प, नोंद वह्या, तर संकलित मूल्यमापनात लेखी परीक्षा अंतर्भूत असते.

अभ्यासक्रम पूर्ण होणार कसा? शिक्षकांना चिंता; शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू
मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यंदा दरवर्षीच्या तुलनेत काहीशा वेळेपूर्वीच पार पडल्या. त्यानंतर इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षेपूर्वी सर्व शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन आणि परीक्षेसंदर्भात शाळा स्तरावरील सर्व नियोजन कोलमडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचे काय होणार याचीच चिंता शिक्षक, मुख्याध्यापकांना लागली आहे.
पहिली ते आठवीसाठी २० ऑगस्ट २०१०च्या निर्णयानुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती वापरली जाते. त्यानुसार आता द्वितीय सत्रासाठी आकारिक व संकलित मूल्यमापन सुरू आहे. आकारिक मूल्यमापनात प्रकल्प, नोंद वह्या, तर संकलित मूल्यमापनात लेखी परीक्षा अंतर्भूत असते.
संबंधित विषयाच्या शिक्षकाने हे आकारिक मूल्यमापन पूर्ण करावे, अशी अपेक्षा असते. हे करत असताना विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षाही घेतली जाते.
यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा वेळेआधी
नववीसाठी ८ ऑगस्ट २०१९च्या शासन निर्णयानुसार प्रश्नपत्रिका काढल्या जातात. परंतु, हे सर्व काम शासनाच्या निर्णयानुसार सुरू असताना यंदा दहावी आणि बारावी परीक्षा वेळेआधी घेण्यात आली.
ऐनवेळी घेतलेल्या निर्णयामुळे परीक्षा उशिरा होत आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाण्यासाठी अनेकांनी रेल्वे, एसटीचे तिकीट काढले. त्या नियोजनावर पाणी फेरले आहे. शंकर पाटील, पालक
‘निपुण भारत’चाही फटका
शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू झाली. त्यातच ‘निपुण भारत’चा आदेश निघाला. याचा परिणाम असा झाला की, दहावी - बारावीच्या परीक्षा लवकर असल्यामुळे अभ्यासक्रमही जलद घेण्याचा सपाटा लागला. परिणामी इतर इयत्तांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. सरकारी आदेशात विविध प्रकारच्या लिंक जारी झाल्या.
त्या शिक्षकांनी संबंधित माहिती भरायची आहे. यामुळे शाळा स्तरावर पहिली ते नववीचे नियोजन विस्कळीत झाल्याचे शिक्षक, मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.
परीक्षांबाबत शाळा स्तरांवर निर्णय होण्योएवजी सरकारने तो घेतला. शिक्षकांची प्रशिक्षणे सुरू आहेत. उत्तरपत्रिका मॉडरेशन ही संकल्पना माहिती नसलेल्या व्यक्तीच्या हाती शैक्षणिक धोरणाची सूत्रे आहेत. विद्यार्थ्यांचे भले कसे होणार?
महेंद्र गणपुले, महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ