Join us  

Breaking: ठाकरे सरकारचा सावध पवित्रा; 'या' विशेष नियुक्त्या रद्द करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 5:33 PM

गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि भाजपा-शिवसेनेची युती तुटली.

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांना मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अरविंद सावंत यांची राज्याच्या संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर निवड केली होती. तसेच मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज झालेल्या रवींद्र वायकरांना मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयक पदावर घेतलं होतं. मात्र आता अरविंद सावंत आणि रविंद्र वायकर यांच्या विशेष नियुकत्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र नियुक्ती करण्यात आल्यानंतर दोन्ही लाभाची पदं असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यामुळे अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी, तर रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयातील प्रमुख समन्वयक पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर या दोन्ही नेत्यांची नियुक्ती राज्य शासनाने परिपत्रक काढून केली होती. त्यात या नेत्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असल्याने त्यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते, सुविधा याबाबत वादंग निर्माण होऊ शकतं असे वर्तविण्यात येत होते. तसेच ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमानुसार भाजपाने या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याची तयारी देखील केली होती.

अरविंद सावंत आणि रवींद्र वायकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आले होते. मात्र ऑफिस ऑफ प्रॉफिटनुसार विरोधी पक्ष भाजपाने सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली होती. मात्र भाजपाकडून पुढची कार्यवाही होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांचे राजीनामे घेतले आहेत. 11 फेब्रुवारीला रवींद्र वायकर यांची नेमणूक झाली होती तर 14 फेब्रुवारीला अरविंद सावंत यांची नेमणूक झाली होती.

गेल्यावर्षी विधानसभा निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि भाजपा-शिवसेनेची युती तुटली. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले त्यापूर्वी शिवसेना केंद्र सरकारमधून बाहेर पडली होती. मुख्यमंत्रिपदावरून वाद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपासोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तर मंत्रिमंडळाला रवींद्र वायकरांना स्थान न दिल्याने या दोन्ही नेत्यांचे राजकीय पुनर्वसन शिवसेनेकडून करण्यात आले होते. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारअरविंद सावंतरवींद्र वायकर