शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध, अजित पवारांनी दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 15:14 IST2021-12-24T15:02:22+5:302021-12-24T15:14:22+5:30
आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली. ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन निर्णय घेतले होते.

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध, अजित पवारांनी दिला शब्द
मुंबई - महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिली. विधानसभा अधिवेशनात विरोधकांकडून राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यात शिवसेना आमदाराने शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा ताराकींत प्रश्न विचारला होता.
कोरोनामुळे राज्याची तसेच देशाचीही परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाऊनमुळे राज्याचे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले आहे. आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर उरलेल्या शेतकऱ्यांना मदत देणारच अशी घोषणाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत केली. तसेच कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पिक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे एकमेव राज्य आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
मागील अर्थसंकल्पातील निर्णय मार्गी लावले जातील. महाविकास आघाडी सरकार पुढील अर्थसंकल्पापर्यंत दिलेला शब्द, घेतलेले निर्णय पूर्णत्वास नेईल. वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत म्हणून शून्य टक्के व्याजानं तीन लाखांपर्यंतचं पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल.#हिवाळीअधिवेशन२०२१pic.twitter.com/ngDBF8y4M7
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 24, 2021
आमदार प्रकाश आबिटकर यांनी यासंदर्भात तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली. ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासाठी तीन निर्णय घेतले होते. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तर दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
दरम्यान, या योजनेतंर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे. काही शेतकर्यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करु अशी घोषणाही अजितदादा पवार यांनी यावेळी केली.