राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"

By मोरेश्वर येरम | Updated: June 7, 2025 13:17 IST2025-06-07T13:09:02+5:302025-06-07T13:17:44+5:30

राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली. 

going to matoshree when mns chief raj thackeray shows great presence of mind about reunion with uddhav thackeray shivsena | राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"

राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"

मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये खलबतं सुरू असून युतीबाबत दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पण या सगळ्यात राज ठाकरेंकडून मात्र कोणतंही विधान किंवा प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही. इतकंच नाही, तर राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांनाही युतीबाबत कोणतंच विधान किंवा भूमिका जाहीर करू नका असा स्पष्ट आदेश दिलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबतं आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी आज त्यांच्या हजरजबाबी वृत्तीनं उत्तर देत फिरकी घेतली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'शिवतीर्थ'वर आज सकाळपासून सुरू असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर राज ठाकरे कारमधून बाहेर निघाले. पुढे कार थांबवून काच खाली केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींपैकी एक प्रतिनिधी तातडीनं धावत कारपाशी आला आणि राज ठाकरेंना, "कुठे दौरा?" असं विचारलं असता राज ठाकरे यांनी चटकन..."मातोश्रीवर निघालोय..." असं म्हणत फिरकी घेतली आणि घरगुती कामानिमित्त बहिणीकडे चाललोय, असं पुढे लगेच स्पष्टही केलं. अशाप्रकारे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतच्या या सगळ्या चर्चांच्या निमित्तानं राज ठाकरेंचा असा हजरजबाबी वृत्तीचा अनुभव पत्रकारांना आला.

मशाल-इंजिन एकत्र येणार?
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेचा आता पुढचा टप्पा सुरू झाल्याचं चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'शिवतीर्थ'वर मनसेच्या जोरबैठका सुरू आहेत. ज्यात आज स्थानिक पातळीवरच्या वातावरणाचा पहिला अहवाल मनसेच्या उपाध्यक्षांनी राज ठाकरेंना दिल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. या अहवालात मनसेची सध्याची ताकद, युती केल्यानंतरचं चित्र असा आढावा घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही काल पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल असं थेट विधान करत पुन्हा एकदा सकारात्मक पवित्रा घेतला आहे. इतकंच नाही तर फक्त संदेश नाही, लवकरच बातमी देईन, असं म्हणत उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत मशाल आणि इंजिन एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळू शकतं. 

राज ठाकरेंच्या मनात काय?
शिवतीर्थवरील आजच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना बाळा नांदगावकर यांना राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे असं विचारलं गेलं. त्यावर बाळा नांदगावकर यांनीही थेट उत्तर देणं टाळलं आहे. "वरिष्ठ नेत्यांमध्ये काय बोलणं होतंय किंवा झालंय हे मला माहित नाही. राज ठाकरेंच्या मनातलं मला माहित असतं असा तुमचा अंदाज असेल आणि तसं माहित असलं तरी मी ते तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. तो विषय माझ्या अखत्यारित अद्याप आलेला नाही. आमचे पक्षाध्यक्षांच्या मनात जे असेल तेच आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात असतं", असं बाळा नांदगावकर म्हणाले.

Web Title: going to matoshree when mns chief raj thackeray shows great presence of mind about reunion with uddhav thackeray shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.