"एकनाथ शिंदे जिथे जातात, तिथे महिला त्यांना भेटायला येतात. पण, तुम्ही जिथे जातात, तिथून महिला पळून जातात. नवी मुंबईत मिस्टर फाईव्ह पर्सेंट म्हणून ओळखले जाते. आम्हाला जास्त बोलायला लावू नका", असे म्हणत शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी भाजपाचे नेते गणेश नाईक यांना थेट इशारा दिला. गणेश नाईक यांच्याकडून सातत्याने शिंदे यांना लक्ष्य केले जात असून, आता म्हात्रेंनी पलटवार केला आहे.
शीतल म्हात्रे म्हणाल्या, "गणेश नाईक यांचं स्वतःचं अस्तित्व फक्त नवी मुंबई पुरते आहे. जिथे स्वतः तीन वेळा हरले आहेत. त्यांची मुलं दोन-दोन वेळा हरले आहेत. त्यामुळे स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून भाजपाच्या वळचणीला गेलेल्या गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. कारण आपल्या हाताखाली असलेला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत होतोय, हे बघवत नसल्यामुळे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार गणेश नाईक तुम्ही सुरू केलेला आहे."
मिस्टर फाईव्ह पर्सेंट म्हणून ओळख
"अहो, संपूर्ण नवी मुंबईमध्ये मिस्टर फाईव्ह पर्सेंट म्हणून ज्यांची ओळख आहे. म्हणजे नवी मुंबईतील जे कुठले प्रोजेक्ट सुरू होतात, त्यात पाच टक्के जोपर्यंत गणेश नाईकांना दिले जात नाही, तोपर्यंत तो प्रोजेक्ट तिथे सुरू होऊ शकत नाही, असे मी नव्हे नवी मुंबईकर म्हणतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत", असे प्रत्युत्तर शीतल म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना दिले.
महिला पळून जातात म्हणत म्हात्रे काय बोलल्या?
"अहो, शिंदे साहेब जिथे जिथे जातात, तिथे तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात, परंतू आम्ही असं ऐकलं आहे की, गणेश नाईक जिथे जिथे जातात, तिथून महिला पळून जातात. महिला त्यांच्यापासून दूर जातात. याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे. त्यांच्यावर कुठले गुन्हे आहेत, महिलांसंबंधी कोणते गुन्हे आहेत, याची माहिती माध्यमांनीच द्यावी. कारण तेव्हा समजेन की गणेश नाईक ही व्यक्ती काय आहे", असा गंभीर आरोप शीतल म्हात्रेंनी नाईकांवर केला.
"आज तुम्ही जे बोलतात, त्याला आम्हाला अनेक पद्धतीने उत्तरे देता येतात. परंतू आपण आमच्या मित्र पक्षामध्ये असल्यामुळे जास्त बोलत नाही. जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. गणेश नाईक यापुढे जर शिंदेंबद्दल काही गरळ ओकली, तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात असू द्या", असा इशारा शीतल म्हात्रेंनी गणेश नाईकांना दिला.
"शिवसेना आणि एकनाथ शिंदेंचे नामोनिशाण मिटवणारा माई का लाल अजून पैदा झालेला नाही. असे ५६ गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदेंचे काही वाकडं करू शकणार नाहीत", अशा शब्दात म्हात्रेंनी डिवचले आहे.
सहर शेखच्या विधानावरूनही नाईकांना घेरले
एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखने केलेल्या विधानावर बोलताना नाईकांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. आता त्याच विधानावरून म्हात्रेंनी नाईकांना घेरले. शीतल म्हात्रे म्हणाल्या, ""मुंब्र्यातील सहर शेखची बाजू घेऊन गणेश नाईक यांनी आपला खरा रंग दाखवून दिला आहे. सहरच्या हिरव्या रंगाचे शिंतोडे त्यांनी भगव्यावर उडवले आहेत. भगव्याचे नामोनिशाण संपविण्याची स्वप्ने नाईकांना पडत आहेत?", असा सवाल त्यांनी केला आहे.
Web Summary : Shital Mhatre directly warned BJP leader Ganesh Naik, alleging corruption and criticizing his relevance only to Navi Mumbai. She defended Eknath Shinde, asserting Naik's criticisms stem from jealousy of Shinde's success. Mhatre also alluded to alleged criminal cases against Naik.
Web Summary : शीतल म्हात्रे ने भाजपा नेता गणेश नाइक को सीधे चेतावनी दी, भ्रष्टाचार का आरोप लगाया और नवी मुंबई तक ही उनकी प्रासंगिकता की आलोचना की। उन्होंने एकनाथ शिंदे का बचाव करते हुए कहा कि नाइक की आलोचना शिंदे की सफलता से ईर्ष्या के कारण है। म्हात्रे ने नाइक के खिलाफ कथित आपराधिक मामलों का भी उल्लेख किया।