सकाळी ७ नको, ९ नंतर शाळा भरवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:25 IST2025-06-09T13:24:22+5:302025-06-09T13:25:33+5:30
Mumbai School News: राज्यपालांनी सर्वच शाळांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवावी, या मागणीकडे पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी महापालिका आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे.

सकाळी ७ नको, ९ नंतर शाळा भरवा!
- घनश्याम सोनार
मुंबई - राज्यपालांनी सर्वच शाळांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतर भरवावी, या मागणीकडे पालक आणि शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी महापालिका आणि शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सकाळी ९ नंतरच भरवाव्यात, असा निर्णय गेल्या वर्षी राज्यपालांनी जाहीर केला. त्यानंतर उन्हाळ्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजल्यानंतरच शाळेत बोलवावे, असा निर्णय शासनाने जारी केला होता. या पार्श्वभूमीवर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सकाळी ९ पूर्वी बोलावू नये. त्याऐवजी उच्च प्राथमिक आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना सकाळी बोलवावे, याबाबत पालक आग्रही आहेत.
राज्यपालांनी जर निर्णय घेतला आहे, तर पहिली ते पाचवीच्या शाळा या सकाळी ९ नंतरच ठेवल्या पाहिजेत; म्हणजे मुलांचा आराम होईल. त्यांचे आरोग्य ठीक राहील. शासनाने, महापालिकेने त्याची अंमलबजावणी करावी.
- येशू जगाली, पालक, चेंबूर
९ नंतरच शाळा का ?
- बालकांची झोप पूर्ण होते.
- शरीर थकलेले नसते.
- चिडचिडेपणा कमी होतो.
- आळस गेलेला असतो.
- मानसिकरीत्या ती सज्ज असतात.
- अभ्यासात त्यांचे लक्ष लागते.
- शैक्षणिक दर्जा सुधारतो.
-शिक्षकांना ती उत्तम सहकार्य करतात.
लहान वयातील बालकांना सकाळी लवकर शाळेत पाठवल्यास त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. जगभर प्राथमिक शाळेतील बालकांना सकाळी ९ वाजल्यानंतरच शाळेत बोलावतात. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- अक्षय पाठक,
अखिल भारत शिक्षा अधिकार मंच