CM शिंदेंकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; आता शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 20:45 IST2023-11-09T20:43:55+5:302023-11-09T20:45:03+5:30
मेट्रोची वेळ वाढवल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

CM शिंदेंकडून मुंबईकरांना दिवाळी भेट; आता शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता धावणार
मुंबई - मुंबईची दुसरी जीवनवाहिनी ठरलेल्या मुंबई मेट्रोने आता रात्री आणखी उशिरापर्यंत प्रवास करता येणार आहे. यासाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वरून शेवटची मेट्रो आता १०:३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे अध्यक्ष या नात्याने हा निर्णय घेऊन मुंबईकरांना दिवाळीची भेट दिली आहे. या निर्णयानुसार शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आरामदायक मेट्रोने रात्री ११ पर्यंत सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
मुंबईकर प्रवाशांच्या हिताचा निर्णय जाहीर करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, 'दिवाळी सण हा उत्साहाचा आहे. मुंबई मेट्रोची वेळ वाढवून हा उत्साह द्विगुणित करताना आनंद होत आहे. मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबईकरांसाठी मुंबई मेट्रोची वेळ वाढविण्याचा महत्वाचा निर्णय आपण घेतला आहे. दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्याची मागणी होत होती, पण त्यावर ही वेळ केवळ सणासाठी नाही तर कायमस्वरूपी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मुंबई महानगर प्रदेशात ती एक भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरताना दिसत आहे. दररोज लाखो नागरिक मेट्रोने सुखकर प्रवास करू लागले आहेत. मेट्रोची वेळ वाढवल्यामुळे मुंबईकर प्रवाशांना आता रात्री उशिरापर्यंत सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. पर्यावरणपूरक आणि इंधन, वेळेची मोठी बचत करणारी ही मेट्रो मुंबईची शान ठरेल असा विश्वास आहे. आपली मेट्रो स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. फलाटावर आणि स्थानक परिसरातही सुरक्षा नियमांचे आणि शिस्तीचे पालन करा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, सध्या सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. आता मेट्रोच्या वाढीव वेळेमुळे या स्थानकांदरम्यान सकाळी ५:५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या होणार आहेत. तसेच रात्री १० नंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत २ अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम दरम्यान २ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 'मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आत्तापर्यंत सुमारे ६ कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी वन कार्ड खरेदी केलं आहे. आम्ही मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास करता यावा, यासाठी विविध उपाययोजना राबवत आहोत. आज मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याबाबतचा निर्णय देखील मुंबईकरांसाठी दिलासा ठरेल असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.