Devendra Fadnavis on Mumbai High Court Hearing, Maratha Reservation Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत हायकोर्टात आज सुनावणी झाली. हायकोर्टाने उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत आझाद मैदान वगळता, इतर सर्व ठिकाणाहून मराठा आंदोलकांना हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आंदोलकांच्या वाईट वर्तणुकीबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या सुनावणीनंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
कोर्टाच्या सुनावणीवर मुख्यमंत्री म्हणाले...
"मी प्रवासात असल्यामुळे नेमकं कोर्टाने काय म्हटलं आहे ते मी ऐकले नाही. पण मला जे समजले त्यात कोर्ट असे म्हणाले आहे की जी परवानगी देण्यात आली होती, ती काही अटी शर्तींसह देण्यात आली होती. त्या अटी शर्तींचे वारंवार उल्लंघन होत आहे. आंदोलकांकडून रस्त्यांवर सुरू असलेल्या वाईट गोष्टींबाबत कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे कोर्टाने काही निर्देश दिले आहेत. आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल," असे रोखठोक मत फडणवीस म्हणाले.
उपसमिती बैठकीत आरक्षणावर चर्चा...
"आमच्या बैठकांमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबींचा आणि पर्यायांचा विचार केला आहे. आम्ही विचार केलेले पर्याय कोर्टासमोर कशा पद्धतीने टिकू शकतील याबाबत चर्चा झाली असून काही अधिकची माहिती मागवण्यात आली आहे. ती माहिती आल्यावरही आम्ही पुन्हा एकदा चर्चा केली आहे. यावर जो मार्ग काढायचा आहे तो कायदेशीर पद्धतीनेच काढला जावा अशी आमची इच्छा आहे. याबाबतच आमची कार्यवाही सुरू आहे," असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
महिला पत्रकारांशी आंदोलकांचे गैरवर्तन...
"आंदोलकांकडून महिला पत्रकारांवर हल्ला किंवा त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न हे आंदोलनाला गालबोट लावण्यासारखे आहे आपण यापूर्वी 30 पेक्षा जास्त मराठा मोर्चे पाहिलेले आहेत त्यांची शिस्त पाहिली आहे त्यावेळी सरकारने सकारात्मकतेने घेतलेला निर्णय आहे आपण पाहिलेला आहे अशावेळी आपले काम करत असलेल्या पत्रकारांना त्रास देणे योग्य नाही त्यामुळे असे हल्ले होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही याचा सर्व स्तरातून निषेध झालाच पाहिजे