“सलमान खान भारतीय नाही का, RSS कार्यक्रमाला गेला तर काय झाले?”: एकनाथ शिंदेंचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:39 IST2026-02-10T17:35:39+5:302026-02-10T17:39:20+5:30
Deputy CM Eknath Shinde News: सलमान खान RSS कार्यक्रमाला गेला तर काय चुकीचे झाले, असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“सलमान खान भारतीय नाही का, RSS कार्यक्रमाला गेला तर काय झाले?”: एकनाथ शिंदेंचा थेट सवाल
Deputy CM Eknath Shinde News:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजर होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या कार्यक्रमावरून विरोधक टीका करत आहेत. मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला जी मान्यवरांची गर्दी झाली होती, ती त्यांच्या प्रेमापोटी नव्हती तर, नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे होती. रटाळ प्रवचनांना लोक का येतील?, अशी खोचक विचारणाही राज ठाकरे यांनी केली. यातच अभिनेता सलमान खान याने संघाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
सलमान खान संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष झाली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा देशभक्त, राष्ट्रभक्त आहे. कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती संघाच्या माध्यमातून देशाने पाहिली आहे. जेव्हा संकट येते, आपत्ती येते, तेव्हा आरएसएसचे स्वयंसेवक स्वतः घटनास्थळी जाऊन मदत करतात. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देशभक्ती, राष्ट्रभक्ती याचे मार्गदर्शन करतात. अशा कार्यक्रमांना जाणे चुकीचे नाही.
सलमान खान RSS कार्यक्रमाला गेला तर काय झाले?
सलमान खान भारतीय नागरीक आहे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला गेला तर चुकीचे काय केले? सलमान खान याने संघाच्या कार्यक्रमाला जाणे किंवा न जाणे याबाबत प्रश्न का विचारले जात आहेत. सलमान खान घरात गणपती आणतो, भारतीय संस्कृती मानतो. सलमान खानचे कुटुंब भारतीय संस्कृती मानतात, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रभक्ती किती ढोंग आणि पाखंड आहे. जावेद अख्तर यांना आमंत्रण दिल्याचे मला दिसत नाही. ते थोर सामाजिक विचारवंत आहे. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांसोबत काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते. हे बहुतेक त्यांना माहिती नसेल. शाहरूख खानला बोलवले नाही. शाहरूख खानचे आजोबा हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यातील सेनापती होते. त्यांच्या दृष्टीने हे सगळे राष्ट्रद्रोही असावेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली.
LIVE | 📍मुंबई 🗓️ 10-02-2026 📹 पत्रकारांशी संवाद https://t.co/TpN5kEIwkR
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 10, 2026