Join us  

...तर मुनगंटीवारांना जास्त आनंद होईल; अजित पवारांनी सांगितले 'राज'कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 8:03 PM

पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तम साहित्यिक होऊ शकतात असं मला जाणवायला लागलं आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचं आज  उद्घाटन  करण्यात  आले.  या उद्धघाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील भाषणात अजित पवार यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

अजित पवार म्हणाले की, पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तम साहित्यिक होऊ शकतात असं मला जाणवायला लागलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नसल्याचे सांगत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आता दिल्लीला जावं, ते दिल्लीला गेले तर सगळ्यात जास्त आनंद भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना होईल असा टोला देखील अजित पवार यांनी यावेळी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच मला वाटलं नव्हतं या विषयावर बोलण्याची माझ्यावर वेळ येईल. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझ्यावर हे बोलण्याची वेळ आली असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या अर्थसंकल्पांवर असेच पुस्तकं लिहत राहा असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे नेतृत्व लवकरच राज्यसभेवर पाठविणार असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र मी दिल्लीत जाणार असल्याच्या बातम्या कुठून येताहेत ते माहिती नाही, या बातम्यांचा सोर्स काय हेही कळत नाही. पक्षाने मला महाराष्ट्रात विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

टॅग्स :अजित पवारदेवेंद्र फडणवीसउद्धव ठाकरेसुधीर मुनगंटीवारभाजपाकेंद्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र