अकरावी प्रवेशासाठी ओपन टू ऑल प्रक्रिया राबविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 19:27 IST2020-06-24T19:26:49+5:302020-06-24T19:27:20+5:30
तरतुदीमधील बदलानंतर शाळा मुख्याध्यापकांचे पुन्हा होणार ऑनलाईन प्रशिक्षण

अकरावी प्रवेशासाठी ओपन टू ऑल प्रक्रिया राबविण्याची मागणी
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची कट ऑफ यादी न ठेवता सुरुवातीला अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर कालावधी ठरवून ओपन टू ऑल एनी टाईम प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट चालू ठेवावी. यामुळे प्रवेश न घेतलेला कोणताही विद्यार्थ्याने वेबबसाईटवर जाऊन अर्ज भरल्यानंतर त्वरित रिक्त जागांची माहिती मिळेल आणि त्याच्या पसंतीच्या ठिकाणी त्याला प्रवेश घेता येईल अशी तरतूद करावी अशी मागणी सिस्कॉम संस्थेकडून शिक्षण संचालकाकडे करण्यात आली आहे. रेल्वे बुकिंग किंवा बँकिंग पद्धतीनुसार ही प्रवेशाची वेबसाईट चाली ठेवल्यास विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहणार नाहीत अशी अपेक्षा सिस्कॉमच्या वैशाली बाफना यांनी व्यक्त केली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेला लेटमार्क लागल्यामुळे यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून काही नवीन तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र एफसीएफएस(प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ) फेरी रद्द करून त्याऐवजी अतिरिक्त विशेष फेऱ्या राबविल्याने काही फरक पडणार का असा सवाल सिस्कॉमच्या वैशाली बाफना यांनी उपस्थित केला आहे. यंदा महानगरपालिका अंतगर्त चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांमध्ये ५० टक्के इनहाऊस जागा पालिका शाळांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खर्च आरक्षित केल्या जाणार असतील तर प्रक्रियेआधी अशा महाविद्यालयांची नियमावली, अटी अशा गोष्टींची माहिती तत्काळ जाहीर करावी अशी मागणी सिस्कॉमकडून करण्यात आली आहे.
शाळा व मुख्याध्यापकांना पुन्हा देणार ऑनलाईन प्रशिक्षण
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात कोरोनाच्या आधीच उपसंचालक कार्यालयाकडूननक शाळा व मुख्याध्यापकांना अकरावी प्रवेशाबाबत सूचना व मार्गदर्शन करून त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले होते. मात्र आता सुसूत्रतेच्या निमित्ताने प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेले बदल मुख्याध्यापक व शाळा यांच्यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यांचयपर्यंत योग्य माहिती पोहचली तरच विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज व्यवस्थित भरता येणार आहेत. त्यानुसार रद्द झालेल्या फेऱ्या आणि इतर प्रक्रियेची त्यांना माहिती होणार आहार. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागातील सर्व शाळा आणि त्यातील मुख्यध्यापकांचे अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठीचे ऑनलाईन प्रशिक्षण पुन्हा एकदा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.