महामुंबईत मृत्यूचे तांडव! पाच वेगवेगळ्या दुर्घटनांत ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; चेंबूरमध्ये इमारतीवरून ६ मजूर कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 06:08 IST2026-03-01T06:07:43+5:302026-03-01T06:08:08+5:30
महामुंबई आणि लगतच्या परिसरात गेल्या २४ तासांत अपघातांची मालिका पाहायला मिळाली.

महामुंबईत मृत्यूचे तांडव! पाच वेगवेगळ्या दुर्घटनांत ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; चेंबूरमध्ये इमारतीवरून ६ मजूर कोसळले
मुंबई/पालघर/माणगाव: महामुंबई आणि लगतच्या परिसरात गेल्या २४ तासांत अपघातांची मालिका पाहायला मिळाली. पाच वेगवेगळ्या भीषण दुर्घटनांमध्ये एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी आहेत. चेंबूरमधील बांधकाम दुर्घटना, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील भीषण बाईक अपघात आणि माणगावमधील कार अपघात अशा घटनांमुळे खळबळ उडाली आहे.
दिवसभरातील पाच मोठ्या दुर्घटना:
१. चेंबूर: इमारतीवरून ६ मजूर कोसळले चेंबूरच्या सुभाष नगर भागात एका बांधकामाधीन इमारतीवरून शनिवारी दुपारी ६ मजूर अचानक खाली कोसळले. या दुर्घटनेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
२. वसई: दुचाकी रेसिंग ठरली काळ! तिघांचा मृत्यू मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथे शुक्रवारी मध्यरात्री रेसिंग करणाऱ्या एका स्पोर्ट्स बाईकला भीषण अपघात झाला. यामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नायगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
३. माणगाव: बस प्रवाशांना भरधाव कारने चिरडले मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव जवळ एक थरारक घटना घडली. खासगी बस पंक्चर झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेल्या १६ प्रवाशांना एका भरधाव कारने चिरडले. या अपघातात १४ जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे.
४. पालघर: खाणीत बुडून दोन मुलांचा अंत मनोर येथील टाकवहाळ गावातील एका बंद दगडखाणीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. या बेकायदा खाणी परिसरात मृत्यूचा सापळा ठरत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
५. शिवडी-वरळी पुल दुर्घटना शिवडी-वरळी पुलाच्या कामादरम्यान वरून लोखंडी सळई पडल्याने २२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. पुलांच्या कामाच्या सुरक्षिततेवर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.