Join us  

Coronavirus Breaking: महाराष्ट्रात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमाही सील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 5:17 PM

कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील

मुंबई - राज्यात आणि देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन शासन आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनीही राज्यातील बेजबाबदार नागरिकांना कळकळीचे आवाहन केले होते. त्यानतर, सायंकाळी ५ वाजता उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी लागू केल्याचं जाहीर केलं. 

"कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. 144 कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी ट्विट केलं होतं. त्यानंतर, आता राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.  काल टाळया, थाळी वाजलं म्हणजे हा सायरन असून तो युद्धातील भोंग्याप्रमाणे आहे. राज्यभरात १४४ कलम लागू केलंय. पण, मला आजपासून संचारबंदी लागू करावी लागतेय. ही मौजमजा करण्याची वेळ नाही. म्हणून मी राज्यभरात संचारबंदी जाहीर करत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. आजपासून आंतरजिल्हा सीमा सील करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यात हा विषाणू पोहोचला नाही, त्या जिल्ह्यात हा विषाणू पोहचू नये, हा यामागचा उद्देश आहे, असेही ठाकरेंनी सांगितले. संचारबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, हा काळ महत्वाचा असून ही वेळ निघून जाईल, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. 

दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले असून, लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले असून, लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला होता.  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमुख्यमंत्री