CoronaVirus News : मुंबईत जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे येणार नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 01:08 AM2020-06-23T01:08:54+5:302020-06-23T07:06:43+5:30

CoronaVirus News : जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी केला. 

CoronaVirus News : Corona will be completely under control in Mumbai by July | CoronaVirus News : मुंबईत जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे येणार नियंत्रणात

CoronaVirus News : मुंबईत जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे येणार नियंत्रणात

Next

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा सरासरी कालावधी ३६ दिवसांवर गेला आहे. दुपटीचा कालावधी सरासरीपेक्षा कमी असलेल्या विभागांमध्ये शीघ्रकृती कार्यक्रम राबविण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश येईल, असा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी केला. 
टेस्टिंंग, ट्रॅकिंग, क्वारंटाइन आणि ट्रीटमेंट या सूत्राचा अवलंब पालिकेने केला. वैद्यकीय प्रयोगशाळांना २४ तासांच्या आत कोरोना रुग्णांचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर कोरोना उपचार केंद्र व रुग्णालये यांची क्षमता वाढविण्यात आली. मे महिन्यातील ३,७०० रुग्णशय्यांच्या तुलनेत आज रुग्णालयांमध्ये १२ हजार खाटा उपलब्ध आहेत. जूनअखेरपर्यंत १५ हजार तर जुलै अखेरपर्यंत २० हजार रुग्णशय्या उपलब्ध असतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मिशन झिरो या मोहिमेबद्दल स्पष्ट करताना कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. खाटा वाढविताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनात पालिकेने पाचपट वाढ केली.
महाराष्ट्रातील ज्या भागांमध्ये संसर्ग कमी आहे अशा भागांतून डॉक्टरांना मुंबईत आणण्यात आले. मे महिन्यातील १००च्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या आता ७००पर्यंत पोहोचली आहे. वरळी, धारावीप्रमाणे देवनार, गोवंडी, बैंगनवाडी या सर्व आव्हानात्मक भागांमध्ये फिरते दवाखाने व वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक बाधित शोधले आणि संपर्कातील व्यक्तींचे अलगीकरण केले. यातून विषाणूची साखळी मोडण्यासाठी मदत झाली, असे त्यांनी सांगितले.
>डायलिसिसवरील बाधित रुग्णाचा मृत्यू नाही
आतापर्यंत मुंबईतील सुमारे ९४ लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये पाच लाख ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. टाळेबंदी सैल केल्यावर संसर्ग वाढण्याची भीती होती. सुदैवाने ३ ते २२ जून २०२० म्हणजे मागील १९ दिवसात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आहे. गेल्या एका महिन्यात डायलिसिस आवश्यक असलेल्या कोरोनाबाधित एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा पालिकेचा दावा आहे.
>अडीच हजार बेड रिकामे
महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये वॉर्ड वॉररूम तयार केल्याने आता पालिका स्वत: पॉझिटिव्ह रुग्णांपर्यंत पोहोचते, त्यांच्याशी संपर्क आणि सुसंवाद साधून सर्व समस्यांचे निराकरण करीत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे आज रुग्णालयांमधील सुमारे अडीच हजार कोविड बेड रिकामे आहेत. तर १,३०० आयसीयू रुग्णशय्यांपैकी ७१ रिकामे आहेत. याच पद्धतीने कामगिरी होत राहिली तर जुलै मध्यापर्यंत मुंबईतील कोविड संसर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने नियंत्रणात असेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

Web Title: CoronaVirus News : Corona will be completely under control in Mumbai by July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.