Join us  

coronavirus: तेव्हा सरकार तरले ते आता काय कोसळणार? संजय राऊतांचा फडणवीसांना रोखठोक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 9:55 AM

फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन हे शिवसेना आणि भाजपात घडले. तरीही तेव्हा ते टिकले. अगदी मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते टिकले, मग आताच कसे पडेल असा सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना विचारला आहे.

ठळक मुद्दे सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेतआता तीन पक्षांत काहीतरी मतभेद होऊन हे सरकार पडेल याकडे विरोधी पक्षाच्या आशा लागल्या आहेतशरद पवार हे या ठाकरे सरकारच्या स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते आहेत. सरकारच्या भविष्यवाणीविषयी खात्रीने फक्त तेच सांगू शकतात

मुंबई - एकीकडे राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकाधिक प्रमाणात वाढत असतानाच दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दरम्यान, राज्यातील ठाकरे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असा दावा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामधून रोखठोक टोला लगावला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन हे शिवसेना आणि भाजपात घडले. तरीही तेव्हा ते टिकले. अगदी मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते टिकले, मग आताच कसे पडेल असा सवाल संजय राऊत यांनी विरोधकांना विचारला आहे.

राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या सराकारमध्ये कमालीचे मतभेद असून, आम्ही हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही तर ते अंतर्विरोधानेच  पडेल, असा दावा विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.फडणवीस यांनी केलेल्या दाव्याचा सरळ अर्थ असा की, सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत. त्यामुळे आता तीन पक्षांत काहीतरी मतभेद होऊन हे सरकार पडेल याकडे विरोधी पक्षाच्या आशा लागल्या आहेत. शरद पवार हे या ठाकरे सरकारच्या स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते आहेत. सरकारच्या भविष्यवाणीविषयी खात्रीने फक्त तेच सांगू शकतात. तसेच अंतर्विरोधाच्या ठिणग्या उडाल्या तरी सरकारला धोका नाही. कारण हे सरकार टिकायला हवे ही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक पक्षाची मजबुरी आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनाही राऊत यांनी टोला लगावला आहे. राजभवनात विरोधी पक्षाचे नेते जातात. राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात. मात्र कोरोनाचे संकट हाच राष्ट्रपती राजवटीचा निकष ठरवला तर उत्तर प्रदेश, गुजरात मध्य प्रदेशसह किमान १७ राज्यांत सगळ्यात आधी राजवट लावावी लागेल. तसेच केंद्राचे सरकारही कोरोना नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने त्यांच्यावरही कारवाई करावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.

तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प भारतात कोरोना घेऊन आले असा सनसनाटी दावाही संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले, कोरोनाला रोखण्यात केंद्राचे अपयश स्पष्ट दिसत असताना राज्यांना दोष का द्यायचा? गुजरातमध्ये कोरोना विषाणू पसरला तो मोदी यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने जमलेल्या लाखोंच्या जनसमुदायामुळे. अमेरिकेतून ट्रम्प यांच्यासोबत आलेले काही डेलिगेट्स मुंबई तसेच दिल्लीतही वावरले आणि संक्रमण झपाट्याने पसरले, हे नाकारता येणार नाही. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस