Coronavirus in Maharashtra : बेपर्वाईमुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढताहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 03:47 IST2021-04-02T03:47:25+5:302021-04-02T03:47:48+5:30
Coronavirus in Maharashtra : कोरोना संक्रमण वाढण्याचे मोठे कारण हे लोकांकडून नियमांचे योग्यरीत्या पालन न होणे होय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले की, कोरोनामुळे ९० टक्के मृत्यू हे ४५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे होत आहेत.

Coronavirus in Maharashtra : बेपर्वाईमुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढताहेत
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या २४ तासांत ३९५४४ एवढी झाली. आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, महाराष्ट्रात लोकांच्या बेपर्वाईमुळे सतत रुग्णसंख्या वाढत आहे. मास्क गळ्यात लटकवत ठेवणे किंवा कानाला एकीकडून लोंबता ठेवणे किंवा मास्कच न वापरणे सुरू आहे. मास्क तोंड आणि नाक व्यवस्थित झाकून घेईल असा वापरला पाहिजे. कोणी बोलले तर ड्रॉपलेटस तुमच्या श्वासावाटे पोटात, शरीरात जाऊ नयेत. योग्य अंतर राखणे आणि ठरावीक अंतराने हात साबणाने २० सेकंद धुणे आवश्यक आहे, असे गुप्ता म्हणाल्या. ( Coronavirus is on the rise in Maharashtra due to negligence)
सरकारने कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी गुरुवारी म्हटले की, एप्रिल महिन्यात दररोज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील कोरोनाची लस दिली जाईल. डॉ. निवेदिता गुप्ता म्हणाल्या, कोरोना संक्रमण वाढण्याचे मोठे कारण हे लोकांकडून नियमांचे योग्यरीत्या पालन न होणे होय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले की, कोरोनामुळे ९० टक्के मृत्यू हे ४५ पेक्षा जास्त वयाच्या लोकांचे होत आहेत. याच कारणामुळे आता देशात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लस सरकारी आणि खासगी रुग्णालये आणि कोरोना लसीकरण केंद्रावर रोज दिली जाईल.