Raj Thackeray: “जे आम्हाला वर्षभर जमलं नाही ते तुमच्या एका फोनमुळं झालं; ‘इंडियन पेस्ट कंट्रोल’नं मानले राज ठाकरेंचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:24 IST2021-05-05T15:20:45+5:302021-05-05T15:24:41+5:30
Indian Pest Control Association Thanks to MNS Chief Raj Thackeray: कोरोनाच्या भीतीने दिवसा-रात्री कोणत्याही वेळी सार्वजनिक आणि खासगी वास्तू, निवासी इमारती, बँका, रुग्णालय तसेच महाविद्यालयांना निर्जंतुक करण्याचं आव्हान होतं.

Raj Thackeray: “जे आम्हाला वर्षभर जमलं नाही ते तुमच्या एका फोनमुळं झालं; ‘इंडियन पेस्ट कंट्रोल’नं मानले राज ठाकरेंचे आभार
मुंबई – इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बुधवारी कृष्णकुंज निवास्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मानले आहेत. या शिष्टमंडळाने राज ठाकरेंना आभार पत्र आणि सन्मान चिन्ह दिलं आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन व्यावसायिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य यादृष्टीने सॅनिटायझेशनचं महत्त्व वाढलं परंतु ही सेवा अत्यावश्यक यादीव समाविष्ट नसल्याने कर्मचाऱ्यांना गैरसोयींना समोरं जावं लागलं होतं.
या आभार पत्रात पेस्ट कंट्रोल असोसिएशननं म्हटलंय की, कोरोनाच्या भीतीने दिवसा-रात्री कोणत्याही वेळी सार्वजनिक आणि खासगी वास्तू, निवासी इमारती, बँका, रुग्णालय तसेच महाविद्यालयांना निर्जंतुक करण्याचं आव्हान होतं. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आमच्या कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्यावर बंधनं होती. अशा प्रतिकूल स्थितीतही आम्ही आमचं व्यावसायिक काम निष्ठेने करत राहिलो. कोरोनाकाळात कोणतीही रोगराई पसरून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होणार नाही याची खबरदारी घेतली. आमच्या सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवेत व्हावा यासाठी आम्ही अनेकदा प्रयत्न केले. पण दुर्दैवाने आम्हाला प्रत्येकवेळी अपयश आलं.
गेल्या आठवड्यात इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष राजू परूळकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत आपण विषयाचं गांभीर्य ओळखून तात्काळ राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंची बोललात. पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांच्या यादीत होणं गरजेचे आहे हे तुम्ही त्यांना पटवून दिलं. इतकंच नव्हे तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशीही आपण बोललात आणि आपल्या प्रयत्नामुळेच अखेर पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांच्या यादीत महाराष्ट्रा सरकारने अधिकृतपणे केला आहे. त्याबद्दल तुमचे आभारी आहोत असं या पत्रात म्हटलं आहे.
संचारबंदीत पेस्ट कंट्रोल, औषध फवारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवामध्ये प्रतिबंध करण्यात आल्यामुळे 'इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएश'ने राजसाहेबांची भेट घेतली. राजसाहेबांनी महाराष्ट्र सरकारशी संपर्क साधला व ह्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवांमध्ये सामावून घेण्यात आलं. pic.twitter.com/m5aKYNQ4QJ
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 5, 2021
त्याचसोबत जे काम आम्हाला वर्षभरात जमलं नाही ते काम आपल्या प्रयत्नांमुळे फक्त एका आठवड्याच्या आत झालं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन या सेवांचा समावेश अत्यावश्यक सेवांच्या यादीत करण्याचा पहिला मान हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. लवकरच देशातील इतर राज्येही महाराष्ट्राचं अनुकरण करतील असा विश्वास आहे. आपण जे सहकार्य केले त्याबद्दल राज्यातीलच नव्हे तर देशभरातील हजारो पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटायझेशन व्यावसायिकांच्या वतीनं आपले मन:पूर्वक आभार मानत असल्याचं संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सासीधरण, राकेश कानुंगो, अरविंद शर्मा, डी. पी शाही आणि विशाल शेट्टी यांनी सांगितले आहे.