Join us  

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 8:49 AM

सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, मी राज्य सरकारवर टीका करत नाही. मी जे बोलतोय ते सकारात्मक दृष्टीने घ्यावं. मी आमच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे असं पाहू नये असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पहिल्यांदाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या वर पोहचली आहे तर १ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे नोकरवर्ग महामारीच्या संकटाचा सामना करत आहे पण दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं दिसून येते असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं आहे.

याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात काही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्तीसाठी रखडले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना दोन-दोन कामं दिली आहेत. या अधिकाऱ्यांची योग्य जागी नियुक्ती करणे हे मुख्यमंत्र्यांचे पहिलं काम आहे. अधिकाऱ्यांची योग्यता आणि अनुभव लक्षात घेऊन त्यांना योग्यठिकाणी नियुक्त करावं त्यामुळे राज्याला लाभ होईल. राज्यात १० आयएएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्याकडे काहीच काम नाही असं त्यांनी सांगितले.

सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही, मी राज्य सरकारवर टीका करत नाही. मी जे बोलतोय ते सकारात्मक दृष्टीने घ्यावं. मी आमच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे असं पाहू नये असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनीही राज्य सरकारवर टीका करत चव्हाणांनाही टोला लगावला आहे. मुंबईत कोरोनाचं थैमान पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ४७ लोकांचा जीव गेला. दर २ तासाला २ मुंबईकरांचा मृत्यू होत आहे. शनिवारी एकाच दिवशी ८८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. प्रत्येक तासाला ३७ रुग्ण सापडत आहेत. या अपयशाची जबाबदारी कोणी घेईल का? कुणाला तरी बलिदान द्यावं लागेल. मंत्री अथवा बाबू? असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सांगण्यानुसार शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार कोरोनाला तोंड देण्यासाठी अपयशी ठरलं आहे. पण या अपयशाला जबाबदार कोण हे सांगितलं नाही. हे तेच चव्हाण साहेब आहेत ज्यांनी शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचा सुवर्ण विचार मांडला होता असा टोला संजय निरुपम यांनी चव्हाणांना लगावला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपृथ्वीराज चव्हाणउद्धव ठाकरेसंजय निरुपमकाँग्रेसशिवसेना