कुर्ला येथे सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी झाले. याच दरम्यान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी कुर्ला बस अपघात प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. "सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाखांची मदत द्या" असं म्हटलं आहे. ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाची बेजबाबदारी पुन्हा एकदा उघड झाली आहे असंही म्हटलं आहे.
वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कुर्ला बस अपघात प्रकरणी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. सध्या बेस्ट प्रशासनाच्या ठेकेदारी पद्धतीचा खेळखंडोबा सुरू आहे. ठेकेदारांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाची बेजबाबदारी पुन्हा एकदा उघड झाली आहे. बसेसची योग्य देखभाल नाही, चालक- कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण नाही. सगळीकडे नुसता सावळा गोंधळ सुरू आहे आणि या गोंधळाने मुंबईकरांचे जीव धोक्यात टाकले जात आहेत."
"२०२४ मध्ये आतापर्यंत बेस्टच्या अपघातात १९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर त्यातल्या ३० टक्के बेस्ट बस या कंत्राटावर दिलेल्या होत्या. हे आकडे पाहून तरी सरकार आणि मुंबई महापालिकेला जाग येणार का? मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी भाडेकरार रद्द करण्यात यावे आणि संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे" असं वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ एका भरधाव बेस्ट बसने रात्री ४ ते ५ वाहनांना धडक दिली तसेच पादचाऱ्यांना चिरडलं. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. बेस्ट बसच्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी तसेच पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत केली पाहिजे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्याचं समजतं. परंतू ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्यात यावेत" असं वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"मला कॉल केला अन् म्हणाली..."; कुर्ला अपघातात मृत्यू झालेल्या आफरीनच्या वडिलांनी फोडला टाहो
अपघातातील मृतांमध्ये २० वर्षीय आफरीन शाहचाही समावेश आहे. सोमवारी आफरीनच्या नवीन नोकरीचा पहिलाच दिवस होता. ती कामावरून परतत असताना ही धक्कादायक घटना घडली. नोकरीचा पहिला दिवस आफरीनसाठी शेवटचा दिवस ठरला. याच दरम्यान आफरीनचे वडील अब्दुल सलीम शाह यांनी मुलीसोबत शेवटचं काय बोलणं झालं ते सांगितलं आहे. कामाचा पहिलाच दिवस असल्याने कामावरून घरी परतण्यासाठी रिक्षा शोधत असताना शाह आपल्या मुलीशी शेवटचं बोलले. शाह यांनी आफरीनला हायवेच्या दिशेने जाऊन रिक्षा पकडण्याचा सल्ला दिला होता. हाच त्यांच्यातला शेवटचा संवाद झाला.