“सैफ अली खान हल्लाप्रकरणी CCTVतील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? पोलिसांनी खुलासा करावा”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:52 IST2025-01-23T17:51:15+5:302025-01-23T17:52:08+5:30
Congress Nana Patole News: सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला.

“सैफ अली खान हल्लाप्रकरणी CCTVतील व्यक्ती व अटक केलेला एकच आहे का? पोलिसांनी खुलासा करावा”
Congress Nana Patole News: अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहीर केले आहे. परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही, असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईतील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वांद्रे भागात अभिनेत्याच्या घरात हल्ला झाल्याने सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत तसेच गावातील सरपंचही सुरक्षित नाहीत तर राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? हा कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न असून निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर बसवून सरकार काम करत आहे त्याचासुद्धा हा परिणाम आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण
सैफ अली खानवरील हल्ल्याने बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सैफवरील हल्ला हा हिंदू मुस्लीम नसून तो सुरक्षेचा व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, परंतु सत्ताधारी भाजपातील काही लोक त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी भाजपा सरकारनेच सीबीआय चौकशी केली होती, आजपर्यंत सीबीआयने त्यांचा अहवाल दिला नाही. भाजपा सरकार हिंदू सुशांतला न्याय देऊ शकले नाही असेच म्हणावे लागले. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतही सत्ताधारी भाजपा धार्मिक अजेंडा राबवत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी भाजपा युतीने लाडकी बहीण योजनेचा गाजावाजा करत सर्व भगिनींना प्रति महिना १५०० हजार रुपये दिले. पण आता या योजनेचा लाभ चुकीच्या लोकांनी घेतला, या योजनेत त्रुटी आहेत. बांगलादेशींनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचा साक्षात्कार सरकारला झाला आहे. योजना सुरु करताना सरकारला त्रुटी दिसल्या नाहीत का? बांगलादेशींनी या योजनेचा लाभ घेतला तर हे बांग्लादेश भारतात, महाराष्ट्र आले कसे? केंद्रात मागील ११ वर्षांपासून मोदींचे सरकार आहे. मग मोदी सरकार कमजोर आहे, असे भाजपाला म्हणायचे आहे का? असा प्रश्न विचारून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणाऱ्या सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.