“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 05:31 PM2023-12-03T17:31:16+5:302023-12-03T17:35:31+5:30

Congress Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असे म्हटले आहे.

congress nana patole reaction over four state assembly election result 2023 | “विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

“विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात परिणाम नाही, मविआ-इंडिया आघाडी मजबूत”; काँग्रेसला विश्वास

Congress Nana Patole News: विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तिसगडमध्ये विजयी झाला होता. भाजपचा पराभव झाला होता, ते चित्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही, त्याप्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही, त्यात बदल होईल. काँग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. 

टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम या दोन धर्मात भांडणे लावून ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. काही राज्यांमध्ये त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. काँग्रेस अशा पद्धतीचे राजकारण करत नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक न्यायाचे राज्य आहे. महाराष्ट्रात भाजपाचे विभाजनवादी राजकारण चालणार नाही, राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी राज्यात व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असेही नाना पटोले म्हणाले. 

दरम्यान, तेलंगण विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच तेलंगणात मोठे यश मिळाले. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपच्या धर्मांध अजेंड्याला दक्षिण भारतात स्थान नाही हेच येथील जनतेने दाखवून दिले आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 
 

Web Title: congress nana patole reaction over four state assembly election result 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.