Join us  

लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूकीमध्ये काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो- आशिष शेलार

By मुकेश चव्हाण | Published: February 09, 2021 8:30 PM

नाना पटोले यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावलेला आहे.

मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवू, असं विधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केलं होतं. 

नाना पटोले यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी टोला लगावलेला आहे. आजपर्यंत काँग्रेस किती नंबरी आहे हे जनतेने पाहिले आहे. काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो, पण तो लबाडी, भ्रष्टाचार, फसवणूक या गोष्टींमध्ये असेल, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. 

मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतक-यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरूद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतकऱ्यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं होतं.

भाजपाच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय-

मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपाच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावलेला आहे. त्यामुळे यावर आता शिवसेना काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

टॅग्स :आशीष शेलारकाँग्रेसनाना पटोलेभाजपामहाराष्ट्र सरकार