Join us  

...तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील; उद्धव ठाकरेंचं पुन्हा एकदा आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 4:41 PM

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूरमधील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, इतर देश फक्त कोरोना एके कोरोना असा मुकाबला करत आहे. मात्र आपले तसे नाही. आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला. त्यानंतर आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येणार आहे. त्यातच पाऊसही सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे असून हा कसोटीचा काळ असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच कोरोना विषाणूवर लस येईल तेव्हा येईल पण कायमस्वरूपी चेहऱ्याला मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छतेचे नियम पाळणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्य्यांवर लक्ष केंद्रित करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी सर्व अधिकाऱ्यांना केले आहे. तसेच असं झाल्यास  १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्याचप्रमाणे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा, चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा, कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आढावा बैठकीत केले आहे. सुविधा उभारण्यात मदत केली जाईल, निधीही कमी पडू दिला जाणार नाही मात्र या सुविधा वापरायची वेळ येणार नाही, इतक्या जबाबदारीने काम करा आणि कोरोना रोखा असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर राज्यात जन जागृती करण्याची गरज आहे. कारण ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा सहभाग होता तसाच कोरोना मुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री- प्रवीण दरेकर

काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे

पंतप्रधान कुठे आहे, ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना- रोहित पवार

 उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली असल्याचे बोलले जात आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या- 

'उद्धव ठाकरेंना सगळं बंद करण्याची हौस नाही'; शिवसेनेचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

'भारताने आपली चूक सुधारावी'; पबजीसह ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया

शिवसेनेनं घात केला, आरेमध्येच मेट्रो कारशेड उभारण्याचा डाव; काँग्रेस नेत्याचा आरोप

टॅग्स :उद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरससांगली