शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो पण..; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 19:08 IST2021-06-22T19:07:58+5:302021-06-22T19:08:47+5:30
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या टेलरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे.

शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो पण..; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राजकारण
मुंबई - राज्याच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच, महाराष्ट्रात भाजप-सेना एकत्र येणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे, काँग्रेससह राष्ट्रवादीचे नेतेही हे सरकार 5 वर्षे टीकेल असे ठणकावून सांगत आहेत. त्यासंदर्भात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या टेलरबॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपा नेत्यांनी या पत्रावरुन महाविकास आघाडी सरकावर टीका करायला सुरुवात केली आहे. तर, काही भाजपा नेत्यांकडून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येईल, असा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता धोक्यात आलं आहे का? असं विचारण्यात आलं असता त्यांनी नकार दिला.
“अजिबात नाही. भाजपाला बाहेर ठेवण्याच्या दृष्टीकोनातूनच हे सरकार स्थापन करण्यात आलं होतं. भाजपने राज्यात सर्व गोंधळ घातला होता. आमचं उद्दिष्ट अद्यापही तेच आहे. काँग्रेस काही जिल्ह्यांमध्ये इतकी मजबूत नसून आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे,” असं चव्हाण यांनी सांगितलं. तसेच, शिवसेना-काँग्रेसच्या विचारभिन्नतेबाबतही त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं. तुम्ही त्याकडे हवं तसं पाहू शकता. पण, हे सरकार एका विशिष्ट ध्येयाने तयार करण्यात आलं आहे. आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो, पण भाजपाला अजिबात नाही”, असे थेट उत्तर चव्हाण यांनी दिलंय.