Join us
Daily Top 2Weekly Top 5

११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:15 IST

Sanjay Raut News: महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut News: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत रस्ते, पाणी आणि कचरा यांसारख्या नागरी सुविधांवर चर्चा व्हायला हवी. परंतु, भाजपा तिथेही अयोध्या, जय श्रीराम आणि बाबरी मशीद असे धार्मिक मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करत आहे. आज जी मुंबई दिसत आहे, त्यात ५६ पेक्षा जास्त उड्डाणपूल आणि मोठे प्रकल्प हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून उभे राहिले आहेत. तेव्हा भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ आमच्या सोबतच होता. जे काम शिवसेनेने केले आहे, त्याचे श्रेय चोरू नका, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमची संपूर्ण हयात मुंबईत मराठी माणसाचे हक्क टिकवण्यात गेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर उभे राहिले आहे, पण मराठी माणसाला ताठ मानेने जगता येणे, हाच खरा विकास आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि जबाबदार नेते आहात. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा पद्धतीने खोटे बोलणे तुम्हाला शोभत नाही. जे काम झाले आहे ते झाले आहे, जे नाही झाले ते नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज

हिंदू-मुसलमान किंवा भारत-पाकिस्तान या विषयांचा आधार न घेता भाजपाने एखादी निवडणूक लढवून दाखवावी, मी १ लाख रुपये देईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे १ लाख आणि त्यात माझे १० लाख रुपये मिळवून मी ११ लाख रुपये द्यायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस हे जर स्वतःला शूर आणि महान समजत असतील, तर त्यांनी हे चॅलेंज स्वीकारावे आणि हिंदू-मुस्लिम वादाशिवाय निवडणूक लढवून दाखवावी. पक्षनिधीसाठी हवे असतील तर हे ११ लाख रुपये कधीही घेऊन जाऊ शकता, पण आधी धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय निवडणूक लढवण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान संजय राऊतांनी दिले.

दरम्यान, भाजपाला असे वाटते की जनता मूर्ख आहे आणि त्यांच्या सर्व पाप कर्मांना जनता मान्यता देईल. भाजपाला असे वाटते की महाराष्ट्रात ‘हम करे सो कायदा’ मान्य केला जाईल. मात्र, जनतेचा रोष पाहून या आठवड्यात तिसऱ्यांदा सरकारला माघार घ्यावी लागली आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut Challenges Fadnavis with 1.1 Million Bet for Fair Election

Web Summary : Sanjay Raut challenged Devendra Fadnavis to contest elections without religious polarization, offering ₹11 lakhs if BJP succeeds. He criticized BJP for diverting from civic issues and misleading the public, urging them to address real development.
टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकामुंबई महानगरपालिकामुंबई महापालिका निवडणूक २०२६संजय राऊतशिवसेनादेवेंद्र फडणवीसभाजपामहायुती