Join us  

'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 11:35 AM

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

मुंबई: शिवसेनेने 2014मध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करुन सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी देखील शिवसेनेची आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रससोबत आघाडी हातमिळवणी करण्याची इच्छा होती असं म्हटले आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, शिवसेनेची आता एक एक गोष्टी समोर येत आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असा अंदाज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. मात्र आता पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षपूर्वीचं सांगितल्याने शिवसेनेची  काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती अशा प्रकारचं चित्र आता समोर येत असल्याचं मत प्रविण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे नाइट लाइफबाबत घाईत निर्णय घेणं आवश्यक नाही. नाइट लाइफमुळे मुंबईच्या सुरक्षेवर भर पडणार आहे. तसेच नाइट लाइफचा निर्णय महाराष्ट्राच्या संस्कृतीला आघात असल्याचे देखील प्रविण दरेकर यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या 'त्या' प्रस्तावाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा नाही; २०१४ मध्येच होणार होती महाविकास आघाडी?

पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत  काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या आघाडीबाबत चव्हाण यांनी यावेळप्रमाणेच पाच वर्षांपूर्वीसुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव आला होता, असे सांगितले होते. ते म्हणाले की, ''त्यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अल्पमतातील सरकार स्थापन झाले होते. तर भाजपाविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपाला सत्तेतून दूर करावे, असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मी फेटाळून लावला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.

भाजपाने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपाने प्रयत्न केले. अशा परिस्थिती भाजपाकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी  पर्याची सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजपा आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसपृथ्वीराज चव्हाण