Join us  

"ठाकरे सरकारला मृतवत म्हणावं का? लवकरच तेरावं घालावं लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:36 AM

भाजपाचे नेते अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की, आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही.

मुंबई: देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला केव्हा जाग येणार? असं म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. 'वर्ल्ड स्लीप डे' असं टॅग करत जयंत पाटील यांनी शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला कुंभकर्णाची उपमा देत पाटील यांनी टोला लगावला होता. 

शेतकरी आंदोलनात जवळपास ३००च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?," असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. जयंत पाटील यांच्या या ट्विटनंतर भाजपाने देखील आता प्रत्युत्तर दिलं आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की, आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही. केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा. केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकारला मृतवत म्हणावे का?, असा सवाल उपस्थित करत लवकरच तेरावं घालावे लागेल, असा टोला देखील अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

जयंत पाटलांनी यापूर्वीही साधला होता निशाणा-

यापूर्वी जयंत पाटील यांनी कोरोना लसीकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. देशातील लोकांना आधी कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. भारतात लस नसली तरी चालेल, पण परदेशात पाठवा असं केंद्राचं धोरण आहे. केंद्र सरकार जगभरामध्ये लसींची निर्यात करण्यात आघाडीवर आहे. जगभरात विशेष म्हणजे पाकिस्तान जे आपले मित्र राष्ट्र आहे त्याला आपण लसीकरणाला मदत करत आहोत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला होता.

टॅग्स :उद्धव ठाकरेजयंत पाटीलमहाराष्ट्र सरकारभाजपा