मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. मात्र, याच मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजपने आधी पक्ष फोडला आणि आता बाळासाहेबांचे हिंदुहृदयसम्राट हे बिरुदही लंपास केले," अशी जळजळीत टीका शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
जन्मशताब्दी निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटो शेअर करत मराठीत भावना व्यक्त केल्या. "महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि इथल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला बाळासाहेब ठाकरेंकडून सदैव प्रेरणा मिळते. त्यांचे विचार आणि कार्य आजही मार्गदर्शक आहेत," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या या पोस्टची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली.
अंबादास दानवेंची टीका
पंतप्रधान मोदींच्या या आदरांजलीवर अंबादास दानवे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "एखाद्या पोस्टमध्ये 'हिंदुहृदयसम्राट' हे बिरुद लिहिलेले नसेल, तर भाजप भक्तांना अतीव दुःख आणि त्रास होतो. आज पंतप्रधान महोदयांच्या पोस्टमधून माननीय साहेबांचे 'हिंदुहृदयसम्राट' हे बिरुद वगळण्यात आले. आता भक्त कोणाला दूषण देणार, कुठे रडारड करणार? कारण त्यांच्या शीर्षस्थ नेतृत्वानेच हा शब्द वगळला आहे! पक्ष, चिन्ह, नेता आणि आता बिरुद... गोष्टी लंपास करण्याची मालिका सुरूच दिसते," अशी टीका दानवेंनी केली.