मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती बुधवारी साजरी करण्यात आली आणि गोडसे आडनावावरून मुंबईच्या भाजप आणि काँग्रेस अध्यक्षांमध्ये कलगीतुरा रंगला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड या गोडसेंच्या नातेवाईक असल्याचे वक्तव्य मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले. यावर 'बहुतांश गोडसे हे गांधी विचारांचे' असल्याचे सांगत 'ही शेलार यांची बौद्धिक दिवाळखोरी' असल्याची टीका गायकवाड यांनी केली.
मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याचे दिसते.
गुरुवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना शेलार यांनी गायकवाड यांच्यावर टिप्पणी केली. कदाचित राहुल गांधी यांना माहीत नसेल, वर्षा गायकवाड या गोडसेंच्या नातेवाईक आहेत. त्यांचे लग्नानंतरचे आडनावच गोडसे आहे. पहिली त्याची माहिती घ्यावी आणि मग आम्हाला प्रश्न विचारावा, असे शेलार म्हणाले.
'आमचे आचार, विचारांचे नाते महात्मा गांधीजींशी'
माझे व माझ्या नवऱ्याचे नथुराम गोडसे याच्याशी नाते तर नक्कीच नाही. पण, वैचारिक नातेही दूर-दूरपर्यंत नाही. आमचे आचार आणि विचारांचे नाते हे महात्मा गांधी यांच्याशी आहे.
आशिष यांचे आडनाव शेलार असले तरी शेलारमामांचे शौर्य यांना कधीच प्राप्त होऊ शकणार नाही, अशी टीका खा. वर्षा गायकवाड यांनी केली.
तुम्ही पालकमंत्री आहात.. त्या पदाला जरा जागा.. जबाबदारीने वागा आणि वायफळ बडबड करणे बंद करा, असा टोलाही खा. गायकवाड यांनी लगावला.