शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत; भाजपानं यादीच दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:14 IST2022-04-04T16:12:29+5:302022-04-04T16:14:34+5:30
आता मनसे-राष्ट्रवादी वादात भाजपानेही उडी घेतली आहेत.

शरद पवारांनी राजकीय कारकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत; भाजपानं यादीच दाखवली
मुंबई – मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रामुख्याने लक्ष्य केले. शरद पवारांमुळेच राज्यात जातीयवाद वाढला असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला. राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष केला जाऊ लागला असं राज ठाकरेंनी म्हटलं. मनसेच्या या आरोपानंतर राष्ट्रवादीचे सगळे नेते राज ठाकरेंविरोधात आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. इतका सरडाही रंग बदलत नाही असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं होते. आता मनसे-राष्ट्रवादी वादात भाजपानेही उडी घेतली आहेत.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधत ट्विट केले आहे. त्यात म्हटलंय की, रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक आहे. पण शरद पवारांचं(Sharad Pawar) काय? १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये स्वत: स्थापन केलेला पक्ष समाजवादी काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली असं त्यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली. २०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला शरद पवारच पुढे आले. बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपासोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय किरकिर्दीत कितीवेळा रंग बदललेत? असा टोला भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
◾️पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 4, 2022
◾️२०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता 2/3
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
राज ठाकरेंवर टीका करताना मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, राष्ट्रवादी सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रात एकही दंगल घडलेली नाही. सर्वजाती धर्माला बरोबर घेऊन चालणं हे शरद पवारांचं आवडतं काम आहे. निष्कारणपणे जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामध्ये आग लावायची आणि महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा प्लॅन सुरू आहे त्याचे सूत्रधार हे आहेत. राज ठाकरेंची मनसे कुठल्या पक्षाची ए, बी, सी टीम आहेत त्यावर मला बोलायचं नाही. ते अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर रोख धरला होता.