मालाड पूर्व स्काय वॉकच्या विरोधात भाजप आक्रमक; सत्ताधारी सेना-कॉंग्रेसच्या जनविरोधी कारभाराचा केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 15:31 IST2021-11-30T15:28:08+5:302021-11-30T15:31:51+5:30
मालाड पूर्वेकडील दफ्तरी रोड आकाराने लहान असल्यामुळे आप्पापाडा, कुरार गाव, तानाजी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी व मालाड येथे दैनंदिन कामकाजासाठी पायी येण्याकरिता जिकरीचे झाले होते.

मालाड पूर्व स्काय वॉकच्या विरोधात भाजप आक्रमक; सत्ताधारी सेना-कॉंग्रेसच्या जनविरोधी कारभाराचा केला विरोध
मुंबई- मालाड पूर्व येथील जनतेच्या मागणीनुसार सुरू करण्यात आलेले पादचारी पुलाचे काम काही स्थानिकांच्या विरोधामुळे स्थगित करण्यात आल्याचे सांगून, आज ३ महिने उलटले आहेत. मात्र, तरीही पुलाच्या कामासाठी उभारलेले बॅरिकेड्स हटविलेले नव्हते. हे बॅरिकेड्स हटवण्यास टाळाटाळ करत महानगरपालिकेने स्थानिकांना त्रास देण्याचे काम चालविले होते. सत्ताधारी शिवसेना-कॉंग्रेसच्या या फसव्या आणि जनविरोधी कारभाराविरोधात भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने आज सकाळी आंदोलन करत रद्द झालेल्या मालाड पूर्व पादचारी पुलाचे बॅरिकेड्स हटविले. पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करून दिंडोशी पोलीस ठाण्यात नेले, नंतर त्यांना सोडण्यात आले.
मालाड पूर्वेकडील दफ्तरी रोड आकाराने लहान असल्यामुळे आप्पापाडा, कुरार गाव, तानाजी नगर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करण्यासाठी व मालाड येथे दैनंदिन कामकाजासाठी पायी येण्याकरिता जिकरीचे झाले होते. त्यामुळे आपण मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करून पादचारी पूल मंजूर करून आणला खरा परंतु स्थानिक रहिवासी व व्यापारी यांचा विरोध लक्षात घेत हा पादचारी पूल रद्द करण्याचे ठरविण्यात आले.
पालकमंत्री आदित्य ठाकरे, ज्यांचा मालाड पूर्वशी काहीही संबंध नाही, असे मंत्री असलम शेख यांनी हा पादचारी पूल रद्द करण्यात आल्याचे गेल्या दि,१९ ऑगस्टला घोषित केले होते. मात्र कंत्राटदाराशी झालेल्या ‘अर्थपूर्ण संवादामुळे‘ कोणतेही कायदेशीर किंवा कार्यालयीन आदेश दिले नाही, असा आरोप त्यांनी केला.
मालाड पूर्व स्काय वॉकच्या विरोधात भाजप आक्रमक; सत्ताधारी सेना-कॉंग्रेसच्या जनविरोधी कारभाराचा केला विरोध#Atulbhatkhalkar#BJPKeBlackmailerpic.twitter.com/4g0uXPnR4T
— Lokmat (@lokmat) November 30, 2021
अगोदरच आकाराने लहान असलेल्या दफ्तरी रोडवर उभारण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे तासंतास वाहतूक कोंडी होत आहे. यातही धक्कादायक बाब म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतांवर डोळा ठेऊन मागील पाच वर्षांत पहिल्यादांच मालाडला आलेल्या महापौरांनी महानगरपालिकेचे काम असताना व या पुलाच्या कामाशी काहीही संबंध नसलेल्या एमएमआरडीए अधिकाऱ्यांना काल बोलवून जनतेच्या भावनांचा विचार करून निर्णय घेण्याचे वक्तव्य केले. स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरिता जनतेला खोटे बोलायचे आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या जनतेला सूडबुद्धीने त्रास द्यायचा हा एककलमी कारभार शिवसेना-कॉंग्रेसकडून केला जात असून पुढील आठ दिवसांत या रस्त्यावरील बॅरिकेड्स महानगरपालिकेने हटविले नाही तर जनतेच्या सोयीकरिता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्वतः सर्व बॅरिकेड्स हटवतील, असा इशारासुध्दा आमदार भातखळकर यांनी यावेळी दिला.