प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 19:09 IST2025-06-25T19:05:44+5:302025-06-25T19:09:03+5:30
Mumbai High Court News: दिवसभर याचिकेवर घेतलेल्या सुनावणीचा वेळ वाया गेला, असे कोर्टाने म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
Mumbai High Court News: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनंतर महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांनी वाढीव मतदानाबाबत सातत्याने निवडणूक आयोग तसेच सत्ताधाऱ्यांवर टीका केली. काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही अनेकदा या वाढीव मतदानावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अद्यापही यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच ७६ लाख वाढीव मतदान झाल्याचा दावा करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला होता. परंतु, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी अलीकडेच पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निकाल २५ जून रोजी देणार असल्याचे म्हटले होते. २५ जून रोजी झालेल्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावण्यात आली.
न्यायालयाचा वेळ वाया घालवला
प्रकाश आंबेडकरांनी याचिका दाखल केल्यामुळे न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेण्यास तयारी दर्शवली होती. परंतु, कोणतेही महत्त्वाचे मुद्दे प्रकाश आंबेडकर मांडू शकलेले नाहीत. कोणतेही योग्य ते पुरावे सादर करू शकलेले नाही, असे म्हटले जात आहे. एकंदरीत फक्त आरोप करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे का, अशी शंका उच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाचे अत्यंत महत्त्वाचे कामकाजाचे तास वाया गेले. काल दिवसभर ही याचिका ऐकून आमचा वेळ वाया गेला, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाकडून हा निकाल अपलोड झाल्यानंतर नेमकी याचिका फेटाळण्याची कारणे काय हे पाहता येईल. त्यानंतरच, प्रतिक्रिया देईन, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, याचिकाकर्ता चेतन अहिरे यांचा आरोप आहे की, मतदान संपल्यानंतर आकस्मिकरित्या ७६ लाख मतांची नोंद झाली, जी पूर्वीच्या एकूण आकडेवारीशी जुळत नाही. या प्रकरणी निवडणूक आयोग, केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व इतर विरोधी पक्षांना पत्र लिहून ईव्हीएम वापर तसेच १९६१ मधील निवडणूक नियमांत झालेल्या संशोधनाविरोधात संयुक्त लढ्याचे आवाहन केले होते. प्रकाश आंबेडकर यांनी असेही नमूद केले होते की, ही ७६ लाख मतांची आकडेवारी फक्त 'चूक' नाही, तर ती निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर व लोकशाहीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.