संभाजीनगर, कोल्हापूरला नवी मुंबईहून विमान; मंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक घेऊन त्रुटी सुधारू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 05:42 IST2026-03-24T05:42:26+5:302026-03-24T05:42:32+5:30
नवी मुंबई विमानतळाच्या नव्या वेळापत्रकात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे.

संभाजीनगर, कोल्हापूरला नवी मुंबईहून विमान; मंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक घेऊन त्रुटी सुधारू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवी मुंबईविमानतळाच्या नव्या वेळापत्रकात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. विमानतळावर काही प्रमाणात सुविधांची कमतरता असली तरी त्यावर चर्चा करण्यासाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ परिसरातच विस्तारित बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.
मेट्रो ४,८ चे काम प्रगतिपथावर
आ. सचिन अहिर यांनीही कांदिवलीवरून निघालेला व्यक्ती दुबईला पोहोचेल पण नियोजित वेळेत विमानतळावर पोहोचू शकणार नाही, असा टोला लगावला. तसेच, कनेक्टिव्हिटीचे रस्ते पूर्ण होईपर्यंत मुंबईतील डोमेस्टिक उड्डाणे तिकडे हलवू नका, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मंत्री सामंत यांनी मुंबई विमानतळावरील भार कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नवी मुंबई विमानतळावरून सध्या ७४ देशांतर्गत उड्डाणे सुरू आहेत. विमानतळाला जोडणारे मेट्रो मार्ग ४ व ८ चे काम प्रगतिपथावर असून, कनेक्टिव्हिटीचे प्रश्न युद्धपातळीवर सोडवले जात आहेत, असे सांगितले.
नेमक्या अडचणी काय?
आ. सत्यजित तांबे यांनी नवी मुंबई विमानतळाबाहेरील सुविधांच्या अभावाबाबत प्रश्न उपस्थित केला. विमानतळ सुरू करण्यापूर्वी मूलभूत सुविधा पूर्ण करणे गरजेचे होते. येथे मोबाइल नेटवर्क नसल्याने प्रवाशांना टॅक्सी बुक करणे कठीण झाले आहे. फक्त एअरटेलचे नेटवर्क तिथे पोहोचू शकत असल्याने हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी कधी सोयीचे होणार? विमानतळाबाहेरील २ किलोमीटरच्या अंतरात शौचालय, हॉटेल, वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने आशियातील सर्वांत मोठे विमानतळ म्हणवून घेण्यात काय अर्थ आहे, असा सवाल केला.