भजी-समोसा चविष्ट, पण आरोग्यास धोक्याची घंटा! आहारतज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:05 IST2025-07-08T16:04:02+5:302025-07-08T16:05:13+5:30
पावसाळा सुरू झाला की खवय्या मुंबईकरांना तळलेली भजी, सामोसे यांचा मोह आवरता येत नाही. मात्र, हे चविष्ट खाद्यपदार्थ खाताना थोडो विचार करा, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात.

(AI जनरेटेड इमेज)
पावसाळा सुरू झाला की खवय्या मुंबईकरांना तळलेली भजी, सामोसे यांचा मोह आवरता येत नाही. मात्र, हे चविष्ट खाद्यपदार्थ खाताना थोडो विचार करा, कारण ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. विशेषत: पावसाळ्यात उघड्यावर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते, असा इशारा आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
उघड्यावरील अन्न का धोकादायक?
पावसामुळे वातावरण दमट होते. अशा परिस्थितीत उघड्यावरील अन्नपदार्थांमध्ये जंतूंची वाढ झपाट्याने होते. उघड्यावर धूळ, पाणी व माश्या सहज बसतात. या अन्नातून थेट शरीरात जंतू पोहोचतात. बर्फ तयार करताना वारलेल्या पाण्याची खात्री नसेल, तर बर्फ घातलेली पेये टाळा.
कोणत्या आजारांचा धोका?
उघड्यावरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, ताप, विषमज्वर, अन्न विषबाधा, टायफॉइड, हेपेटायरिस यांसारखे आजार होऊ शकतात.
काळजी कशी घ्यावी?
अन्न नेहमी झाकलेले, स्वच्छ आणि गरम असावे, रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. घरीच स्वच्छतेत बनवलेले अन्न खाणे सर्वोत्तम पर्याय आहे. तज्ज्ञांनी या सवयींकडे लक्ष वेधत आरोग्यदायी जीवनशैलीचा सल्ला दिला आहे.
बाहेरचे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्याने अतिसार, पोटाचे विकास किंवा इतर आजार होऊ शकतात. शक्यतो गरम आणि ताजे अन्नपदार्थ खावेत. तीन ते चार तासांत शिजवलेलेच अन्नपदार्थ कुजण्याची किंवा त्यावर बुरशी लागण्याची शक्यता असते.
- डॉ. शीतल चोले नागरे, आहारतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य विभाग
येथे होते सर्वाधिक विक्री
मुंबईत सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात येतात. यात सर्वाधिक गर्दी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर, मरीन ड्राइव्ह, दादर स्टेशन, जुहू चौपाटी, कुलाबा कॉजवे येथील स्टॉलवर होत असल्याचे सांगण्यात येते.
व्हायरल फिव्हरची प्रमुख लक्षणे
व्हायरल फिव्हरमध्ये अंगदुखी, ताप, थकवा, घसा, खवखव, डोकेदुखी अशी लक्षण आढळतात.